पन्नालाल सुराणा vilasvakil@gmail.com

‘‘ चले जाव आंदोलनापासून ते अगदी स्वातंत्र्य चळवळ, पुढे स्वातंत्र्य ते आणीबाणी, त्याही पुढे भारताच्या राजकीय पटावरील विविध पक्षांचा, राजकीय नेत्यांचा विविधांगी अनुभव घेत आता भूकंपात अनाथ झालेल्या मुला-मुलांसाठी सेवादलाने नळदुर्गला (जि. उस्मानाबाद) येथे ‘आपले घर’ वसतिगृह सुरू केले व इकडे परांडा तालुक्यात वृक्षपट्टी योजना आणि पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबवण्यासाठी शेती मंडळ चालू केले. घाटिपपरीचा प्रकल्प पूर्ण करून आम्ही गावकऱ्यांच्या स्वाधीन केला. दुधी-रुईच्या वृक्षपट्टय़ात पाच-साडेपाच हजार झाडे उभी आहेत. आता सर्जनाचा आनंद घेतो आहे.’’

‘चले जाव’ आंदोलनाचे ते दिवस होते. गवळे गल्लीत राहत होतो. वडील किराणा दुकानदार, किराणा खुंटावर आमचे दुकान होते. नगर पालिका शाळा क्रमांक २ आमच्या गल्लीतच. चौथीतले रुद्राप्पा पोटे, पलीकडल्या हळद गल्लीतले जगन्नाथ दगडे, रसिक वखारिया, पलीकडल्या सोमवार पेठेतला (बार्शीतला सगळ्यात रुंद रस्ता) द. ना. जितकर सगळे एकत्र.  शाळा सुटली. घरी आलो की जेवून सोलापूर रस्त्यावरील काँग्रेस भुवनच्या सेवादल शाखेत जायचो. ‘सब सैनिक, दस्तानायक सज्ज जाओ’ आज्ञा झाली की आम्ही दस्तानायकाच्या मागे पंक्तीत उभे राहायचो. गिन्ती, होश्शार.. झाले की नमस्ते. उजवा हात उचलून जमिनीला समांतर धरून नमस्ते करायचो. कुणाला? समोर पांढऱ्या फक्कीने रेखाटलेल्या वर्तुळातील सहा फूट उभ्या काठीला. नुसता काठीला नमस्ते? शाखा सुटल्यावर केशवरावांना त्याबद्दल विचारले. तर त्यांनी सांगितले की, ‘‘आपण काँग्रेसच्या तिरंगी झेंडय़ालाच (चरखांकित) राष्ट्रध्वज मानतो. पण सरकारने सध्या काँग्रेसवर बंदी घातली आहे. सुपेकर दादांनी सांगितले की, ‘शाखा भरवायला परवानगी देताना पोलिसांनी सांगितले की झेंडा तेवढा लावू नका. बाकी तुमची कवायत, लाठी, सर्वागसुंदर व्यायाम, वगैरे चालू ठेवा.’ आम्ही मधून मधून ‘येथून तेथून सारा पेटू दे देश’ हे साने गुरुजींचे गाणे म्हणायचो. शाखा समाप्त करताना ‘वंदे मातरम’ ही प्रार्थना व्हायची. तिसऱ्या दिवशी शाखेवरून परतताना पोटेने सांगितले की, उद्या पहाटे बोलवायला येतो. आपण प्रभात फेरीत जाऊ. झोपताना आईला मी सांगितले की, ‘सकाळी लवकर उठव बरं का.’ पाचच्या आत पोटेची हाक आली. बिछान्यातून बाहेर आलो, चूळ भरली, चड्डी सावरली आणि निघालो. किराणा खुंटावर वीस-बावीस मुले नि आठ-दहा मुली जमल्या होत्या. काका तिरगेने गाणे सुरू केले. ‘नही रखनी, नही रखनी ये जालीम सरकार नही रखनी.’ मग घोषणा – ‘इंग्रजांनो चालते व्हा,’ ‘महात्मा गांधी की जय,’ ‘भारत माता की जय’. मिरवणूक कापड बाजारातून चारी गल्लीतून भगवंताच्या देवळापर्यंत जाऊन परत सोमवार पेठ – हळदगल्लीतून खुंटावर आली. ‘क्रांती झिंदाबाद रहेगी, क्रांती  झिंदाबाद, मरणाच्या दारात घातली तू आम्हाला साद’ हे गाणे मधुकर तोडगेंच्या मागे मागे म्हणताना स्फुरण चढायचे.

एका संध्याकाळी शाखा सुटल्या. तोडगेंनी तिरंगा झेंडा हातात देऊन म्हटले, ‘नीट खिशात ठेव. उद्या संध्याकाळी हरिजन बोर्डिगमध्ये ये.’ पोटे व रसिकबरोबर मी तेथे पोहोचलो. एकाने शर्टाच्या आत लपवून महात्मा गांधींचा फोटो आणला होता. दुसऱ्याने शाखेवरची काठी आणली होती. एका खोलीत ती रोवली मी नेलेला झेंडा त्यावर फडकवला. सगळे जण म्हणाले, ‘वंदे मातरम्.’ मग एका गुरुजींनी सांगितले, आज गांधी जयंती. स्वराज्य मिळावे यासाठी त्यांनी चळवळ चालू केली आहे. सरकारने त्यांना व अनेक मोठय़ा पुढाऱ्यांना पकडून तुरुंगात ठेवले आहे. आपल्या गावचे शिवाजीभाई आर्य, बापूसाहेब सुराखे म्हणजे आपल्या सेवादलाचे जिल्हाप्रमुख यांना ही पुण्याला तुरुंगात ठेवले आहे. पण आपण भ्यायचे नाही. रविवारी ग्राम सफाई करायची. दुपारी सुतकताई करायची. ‘चरखा चला चला के, लेंगे स्वराज्य लेंगे.’ कार्यक्रम संपवून घरी परतताना आपण काही तरी मोठे काम केले असे वाटले.

चौथी पास झाल्यावर इंग्रजी पहिलीत गेलो. काकाजींनी हौसेने फुल पँट शिवून दिली. आई धार्मिक. ती म्हणाली, ‘‘आता पजुसण (पर्युषण) बसले आहे. संध्याकाळी ठाणकात समई लावून तोंडावर मुहपत्ती बांधून बसायचे. मी सांगते ते म्हणायचे, ॐ नमो अरिहंताणम्.’’ आठव्या दिवशी म्हणाली, ‘‘आज परखी. ठाणकात साधु महाराज आहेत. तू दिवसभर तेथेच राहा. फक्त दोन वेळ जेवायला घरी यायचे.’’ संध्याकाळी, वडीलधाऱ्यांनी पाठीवरून हात फिरवत कौतुक केले. दुसऱ्या दिवशी घरी गेल्यावर आईनेही कौतुक केले. डिंकाची खीर खाऊ घातली. काही दिवस ठाणकात जाणे, समई लावणे चालू ठेवले. ‘पण हे का? कशासाठी? याचा काय उपयोग?’ प्रश्न पडत गेले. आईला विचारले तर ती म्हणायची, ‘‘आगल्या भव मे मोक्ष मीलन वास्ते.’’ तिचे म्हणणे पटले नाही. तिकडे सेवादलाच्या शिबिरात एका बौद्धिकात ऐकायला मिळाले, ‘पूजापाठ करून काही उपयोग नाही.’ गांधीजी म्हणतात, ‘जनसेवा हीच ईशसेवा. सफाई करा, साक्षरता प्रसाराचे वर्ग घ्या.’ अखेर कर्मकांड, उपास करण्यापेक्षा गटार सफाई, सूतकताई, भीमनगर मध्ये जाऊन संध्याकाळी साक्षरता प्रसाराचा वर्ग घेणे, असे वळण मनाने घेतले ते आजवर टिकून आहे.

पुढे काकाजींच्या निधनानंतर आईने दीक्षा घेतली. साध्वी म्हणून पंधरा दिवसांपेक्षा जास्त एका गावी मुक्काम करायचा नाही. चातुर्मास मात्र एका गावीच करायचा. बायको वीणा आणि मी मधूनमधून दर्शनाला जायचो. तेव्हा इतर साध्वी म्हणायच्या, ‘धर्मध्यान करा.’ मग जगत कवरजी त्यांना सांगायच्या, ‘‘त्यांचे धर्मध्यान वेगळे आहे. गरिबांसाठी ते खूप काही करतात. त्यांना काही नका.’’

तत्पूर्वी, एस.एस.सी.ला मला शाहात्तर टक्के मिळाले होते. शहरात पंचाहत्तरपेक्षा अधिकवाले आम्ही तिघे जणच होतो. इंजिनीअर व्हावे वाटले. सायन्सला गेलो. पण मध्येच सेवादलाच्या अभ्यासवर्गासाठी दोन दोन आठवडे परगावी राहिलो. शेवटी व्हायचे तेच झाले. एफ.वाय.ला नापास झालो. खूप हिरमुसलो होतो. बार्शीत मुलींच्या शाखांची संघटक म्हणून वीणा (पुरंदरे) काम करत होती. आठवडय़ातून एक दोनदा बैठकीच्या वेळी तिची भेट व्हायची. माझे मन तिच्याकडे ओढ घेऊ लागले. तसे एस.एस.सी. व्हायच्या आधीच मला ‘बघायला’ यायला लागले होते. वडिलांचे दुकान भरभराटीला आले होते. आई ‘धार्मिक’ म्हणून ख्याती होती. पण दोन बहिणींच्या लग्नाच्या वेळी तो सगळा चार चार दिवस चाललेला सोहळा, भारी कपडय़ांचे व दागिन्यांचे प्रदर्शन, पंगतीत आग्रहाचे वाढणे, त्या चाकोरीत आपण अडकू नये असे वाटत होते. सायन्स सोडून आर्ट्सला गेलो, पुण्याच्या स. प. महाविद्यालयात आम्हा सात-आठ जणांचा गट मधून मधून डॉ. पु. त्र. सहस्रबुद्धेंच्या घरी जमायचो. ते आम्हाला ‘फॉरीन अफेअर्स’ वगैरे मासिके वाचायला द्यायचे. शाळेत असताना मी साहित्य परिषदेच्या प्राज्ञ व विशारद या परीक्षा दिल्या होत्या. कथा-कादंबऱ्यांचे खूप वाचन असायचे. बी. ए. ला मराठी विषय घ्यावा असे मी एकदा म्हणालो, त्यावर प्राध्यापक पु. ग. म्हणाले, ‘‘हे बघ, देश आता स्वतंत्र झाला आहे. तू सेवादलात आहेस, देशाचा आर्थिक विकास नीट झाला पाहिजे. त्यात लक्ष घालण्यासाठी तू अर्थशास्त्र घे. आणि हो मांडणी चांगली करता यावी म्हणून ‘निबंध’ लिहिण्याचा सराव कर.’’ मी त्यांचे ऐकले, पुढे ग्रामीण विकासाच्या आणि राजकारणाच्या क्षेत्रात काम करताना त्यांच्या त्या दोन्ही कानमंत्रांचा खूप उपयोग झाला.

बी. ए. ला ‘इंडियन रुरल प्रॉब्लेम’ हे नानावटी – अंजारिया यांचे पुस्तक अभ्यासाला होते. आपल्या शेतकरी आणि शेतमजुरांची स्थिती किती हलाखीची आहे हे समजू लागले. त्याच वेळी वीणाने आणि मी लग्न करायचेही ठरवले. पण तिची शेवटची परीक्षा व्हायची होती. जे.पी. (जप्रकाश नारायण) हे आचार्य विनोबांच्या भूदान आंदोलनात जीवनदान देऊन उतरले होते. ‘‘सेवादान शहरांपेक्षा खेडय़ांत उभे करणे जास्त महत्त्वाचे आहे. बिहारमध्ये हे काम करायला तुम्ही दोन कार्यकर्ते द्या.’’ असे ते एस.एम.ना म्हणाले. ते कळले. मी अण्णांना भेटलो. त्यांनी चिठ्ठी देऊन गयेला जे.पीं.कडे पाठवले. त्यांनी सोखोदेवरा (जि. नवाळा) येथे सवरेदय आश्रम सुरू केला होता. तेथे राहायला नि आजूबाजूच्या गावांत सेवादलाच्या शाखा सुरू करायला सांगितले. मी ते करू लागलो. त्या वेळी बिहार राज्यात सत्तावीस लाख एकर जमीन भूदानात मिळाली होती. गावातल्या भूमिहीन शेतात मजुरीत आपला पाचवा मुलगा माना आणि त्यासाठी आपल्या जमिनीचा एकपंचमांश हिस्सा द्या, असे विनोबांचे आवाहन होते. भूदान तर खूप मिळते. मात्र कुठेच भूमिहीन शेतमजुराला दिली गेली नाही. चळवळीचे कार्यकर्ते, पत्रकार सगळे प्रश्न विचारायला लागले. एकेदिवशी जेपींनी सुशीला दीदी, सुवर्णकुमार, देवेंद्र व मला बोलून सांगितले. तुमची सध्याची कामे बाजूला ठेवा. या सोखोदेवरा गावात जवळपास सव्वाशे एकर जमीन भूदानात मिळाली आहे. गावात भूमिहीन शेतमजुरांची संख्या मोठी आहे. तुम्ही कसेही करून येत्या २ ऑक्टोबरला त्या जमिनीचे वाटप करायचे ठरवा. मी प. बंगालच्या पी.सी. रॉयला बोलावून ठेवले आहे. शेतजमीन कशी मोजायची, खाता, खसारा (म्हणजे आपल्याकडला सातबारा) वरून भूखंड कुठला हे कसे शोधायचे – काहीच माहीत नव्हते. पण एका निवृत्त पटवाऱ्याची मदत मिळाली. ज्यांनी भूदान दिले त्यांच्यापैकी काही जण त्यांची जमीन दाखवायला टाळाटाळ करू लागले. दोन-तीनदा गाववाल्यांच्या सभा घेतल्या. ज्यांनी प्रामाणिकपणे दान दिलेल्या जमिनी दाखवल्या, त्यांची सगळी कागदपत्रे तयार करण्यासाठी तीन दिवस आणि रात्री खपलो. एकाला जास्तीत जास्त दोन एकर द्यायची. पण तेवढे सलग तुकडे नसायचे. पाच-सहा ठिकाणचे तुकडे मिळून दोन दोन एकर जमिनीचे ‘आदातापत्र’ तयार केले. वेळेवर काम पूर्ण केल्याबद्दल जे.पीं.नी. आमची पाठ थोपटली. आणि लगेच म्हणाले, ‘‘आता वेगवेगळ्या जिल्ह्य़ांत जाऊन तिथले हे काम पूर्ण करा.’’ मला हजारी बाग जिल्हा दिला. तेथे रामगढच्या राजाने सहा लाख एकरांचे दान दिले होते. पण कागदपत्रे व नकाशे पाहिले तेव्हा बहुतेक भाग डोंगराचा तर काही नाल्यांचा आहे हे लक्षात आले. वाटप करण्यालायक चोवीस हजार एकर सापडली ती बारा हजार शेतकऱ्यांना वाटून दिली.

दरम्यान लग्न करून वीणाही तिकडे आली होती. बार्शीहून तार आली ‘काकाजी सीरियस’. मी बार्शीला परतलो. वीणेने बार्शीत दवाखाना सुरू केला. प्रसूतिगृहासाठी कुणी जागा देईना. इकडे पुण्यात ग.प्र. प्रधान व अ. कि. शहांनी सांगितले की, पळशीकर नाही म्हणताहेत तर तू ‘समाज प्रबोधन’ संस्थेचे चिटणीसपद घे. वीणेने नाइलाजाने संमती दिली. ते काम करताना मी एलएल. बी. पूर्ण केले. पुढे प्रॅक्टिस केली नाही. पण कायद्यातली तर्कशुद्धता आणि सर्वव्यापकता खूप भावते. कौटुंबिक कायद्यात लग्न व मृत्यू म्हणजे वारसा या महत्त्वाच्या घटनांविषयी हिंदू आणि मुस्लीम परंपरांतील अनेक किचकट गोष्टी अभ्यासाव्या लागल्या. मात्र या दोन घटनांना काव्यातही फार महत्त्व आहे आणि कायद्यातही तेवढेच आहे. यावर ‘कायदा आणि काव्य’ हा लेख मी कॉलेज मासिकासाठी लिहिला.

१९६२ मध्ये चिनी आक्रमणात आपला पराभव झाल्याने देशभर निराशेची लाट पसरली होती. त्यात कम्युनिस्ट पक्ष म्हणाला की, कम्युनिस्ट देश कधी कुणावर आक्रमण करत नाही. तेव्हा ‘चीनचे आक्रमण : राजकीय पाश्र्वभूमी’ अशी पुस्तिका मी लिहिली आणि समाज प्रबोधन संस्थेच्या वतीने तीस चाळीस कॉलेजांत त्यावर शिबिरे घेतली. त्याचवेळी तीव्रतेने वाटू लागले की खरे आव्हान राजकारणातले आहे. प्रजासोशलिस्ट पार्टीचा (प्रसोपा) राज्य चिटणीस म्हणून मी काम करू लागलो. राज्य कार्यालय नीट चालवणे, जास्तीत जास्त कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवणे, त्यासाठी दौरे करणे आवश्यक होते. पैशांची चणचण असायची. एस.टी. मजदूर सभेचे सरचिटणीस भाऊ फाटक यांनी मला कार्याध्यक्ष केले आणि राज्यभर एसटीने प्रवासाचा फ्री पास दिला.

१९६५ मध्ये प्रसोपा (लोहियांचा)आणि सोशालिस्ट पार्टी यांचे एकीकरण होऊन ‘संयुक्त सोशलिस्ट पार्टी’ अस्तित्वात आली. मधु लिमये, नाथ पै, ह. वि. कामथ आणि डॉ. लोहिया यांच्या लोकसभेतील कामगिरीमुळे संपूर्ण देशभर व्यापक पाठिंबा मिळू लागला. निवडणुकांत काँग्रेसला चाळीस टक्क्यांपेक्षा कमी मते मिळत. तरी विरोधकांच्या मतांची विभागणी होण्याने केंद्र आणि बहुतेक राज्यांतील सत्तेवर काँग्रेसचा एकाधिकार कायम राहिला. असे होत राहिले तर लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडेल. म्हणून ‘काँग्रेस हटाव’ची घोषणा लोहियांनी दिली आणि त्यासाठी तो पर्यंत ज्यांना समान दुरीवर ठेवावे असे म्हणत कम्युनिस्ट व जनसंघ यांच्याशी सहकार्य करावे असा आग्रह त्यांनी धरला. पक्षातल्या अनेक कार्यकर्त्यांना ते मान्य नव्हते. प्रत्यक्षात विरोधी पक्षाचे ऐक्यही झाले नाही. पण लोकांत असंतोष खूप होता. लोकसभेत काँग्रेसला जेमतेम काठावरचे बहुमत मिळाले. आठ-नऊ राज्यांत त्यांचा पराभव झाला. पण विरोधी पक्षांना जनहितकारी धोरणे राबवण्यात यश मिळाले नाही. लोहियांचे अकाली निधन झाले. काँग्रेसमध्येही इंदिरा गांधींची कोंडी होऊ लागल्याने त्यांनी जुन्या नेत्यांना बाजूला सारले. १९७१ च्या निवडणुकीत जनसंघ आणि संघटना काँग्रेस या पक्षांसोबत आमच्या नेत्यांनी नवी आघाडी बनवली. त्यांनी घोषणा दिली ‘इंदिरा हटाव’. त्यावर इंदिराजींनी ‘गरिबी हटाव’चा नारा बुलंद केला. नव्या आघाडीतील समाजवादी पक्षाचा दारुण पराभव झाला.

जॉर्ज फर्नाडिस, मधु लिमये, मधु दंडवते, कर्पूरी ठाकूर आदींनी परत पक्षाची बांधणी सुरू केली. ‘मागास जातींना विशेष अवसर’ या लोहियांनी यांनी सुचवलेल्या व कर्पूरी ठाकूर यांनी अमलात आणलेल्या धोरणामुळे मागास जाती-जमातींचा सोशलिस्ट पार्टीला मोठय़ा प्रमाणावर पाठिंबा मिळू लागला. १९७३-७४ मध्ये दुष्काळ, महागाई वगैरे मुद्दय़ांवरून देशभर जनआंदोलने होऊ लागली. गुजरातच्या विद्यार्थ्यांनी महागाई व भ्रष्टाचार याविरोधात नवनिर्माण आंदोलन सुरू केले. बिहारमधल्या विद्यार्थ्यांपर्यंत ते लोण पोहचले. आपल्या आंदोलनाचे नेतृत्व करायला त्यांनी जे.पीं.ना विनवले. ते नवनिर्माण आंदोलनात उतरले. सगळीकडे ती आग पसरू लागली. त्यातच अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिराजींची लोकसभेवरील निवड अवैध ठरवली. जे.पी. वगैरेंनी आग्रह धरला की इंदिराजींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा. हातातली सत्ता सोडू नये असे त्यांच्या काही सहकाऱ्यांनी म्हटले आणि इंदिराजींनी ते मानले. त्यामुळे २५ जून १९७५ रोजी रात्री त्यांनी राष्ट्रपतींमार्फत अंतर्गत आणीबाणीची घोषणा करायला लावली. रातोरात देशभर जे.पी., मोरारजी देसाई यांसकट असंख्य विरोधी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध करून तुरुंगात टाकले. (म्हणजे त्याविरुद्ध न्यायालयांतही दाद मागता येणार नव्हती.) आणि वृत्तपत्रांवर सेन्सॉरशिप लादली. अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर  मोठा आघात झाला. अनेक लोकशाहीप्रेमी नागरिक आणि कार्यकर्ते संतापले. पण देशात भयाचे वातावरण पसरले होते. आम्ही काही जणांनी पोलिसांना चुकवून भूमिगत चळवळ चालू ठेवली. खऱ्या आंदोलनाच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रके गुप्तरीतीने छापून देशभर कार्यकर्त्यांना पोहोचवण्याचे काम सुरू केले. मी देशभर दौरे काढून कार्यकर्त्यांच्या भेटी घेत राहिलो. आणीबाणीत इंदिराजींनी जाहीर केलेला २० कलमी कार्यक्रम नीट राबवला जात नव्हता. त्यातच संजय गांधींनी नसबंदीची सक्ती करणाऱ्या मोहिमा चालवल्या. सरकारी कर्मचाऱ्यांचा भ्रष्टाचार वाढला होता. तरी उघडपणे प्रतिकार होत नाही हे पाहून आणि आपल्या गुप्तचरांनी  ‘निवडणुकीत तुम्हालाच यश मिळेल,’ असे अहवाल दिल्याने १९७७ च्या मार्चमध्ये इंदिराजींनी लोकसभेच्या निवडणूक घेतल्या. नवनिर्माण आंदोलनात सहभागी झालेल्या जनसंघ, लोकदल आणि संघटना काँग्रेस यांच्यासह समाजवाद्यांनी एकपक्ष स्थापन करावा असा आग्रह त्यांनी धरला. बाबा आढाव, जॉर्ज फर्नाडिस, सुरेंद्र मोहन, मी अशा थोडय़ा कार्यकर्त्यांनी विरोध केला. पण त्याला न जुमानता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांनी सोशलिस्ट पार्टी विसर्जित केली आणि सगळे जण जनता पार्टीत सामील झाले. मोकळीक मिळाल्याबरोबर लोकांचा असंतोष उफाळून आला. काँग्रेसचा दारुण पराभव झाला. जनता पार्टीचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. पण धोरणांमध्ये एकवाक्यता नसणे आणि तीन-चार मोठय़ा पुढाऱ्यांची पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा यामुळे सरकार पडले आणि पक्षही फुटला.

सोशलिस्ट पार्टीचे विसर्जन झाल्याने काय करावे? देशात कष्टकरी शेतकरी, दलित, आदिवासी आदींना न्याय मिळावा यासाठी लोकशाही समाजवादी विचारसरणीची राजकीय संघटना उभी राहिली पाहिजे असे वीणा आणि मी दोघांनाही तीव्रतेने वाटत होते. काही वेळा तर आपण मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षात जावे असे वाटले. पण त्यांचा सशस्त्र मार्गाचा आग्रह नि कामगार वर्गाची हुकूमशाही यामुळे तसे करणे उचित वाटेना. शेवटी आम्ही काही जण सोशलिस्ट फ्रंट्स पुढे सोशलिस्ट पार्टी म्हणून काम करू लागलो. देशातल्या तेरा चौदा राज्यात निष्ठावंत कार्यकर्त्यांची फळी उभी राहिली. निवडणुकीच्या क्षेत्रात धनसत्ता आणि दंडसत्ता यांचा प्रभाव वाढल्याने कष्टकऱ्यांच्या पक्षाला चांगले दिवस येण्याची शक्यता कमी दिसत असली तरी त्यांच्या दीर्घकालीन हितासाठी लोकशाही समाजवादी विचारसरणीचा झेंडा फडकावत ठेवला पाहिजे हे जाणवले. हे व्रत चालू ठेवले आहे..

१९९३ च्या भूकंपात अनाथ झालेल्या मुला मुलांसाठी सेवादलाने नळदुर्गला (जि. उस्मानाबाद) येथे ‘आपले घर’ वसतिगृह सुरू केले व इकडे परांडा तालुक्यात आम्ही वृक्षपट्टी योजना आणि पाणलोट क्षेत्र  विकास कार्यक्रम राबवण्यासाठी शेती मंडळ चालू केले. घाट पिंपरीचा प्रकल्प पूर्ण करून गावकऱ्यांच्या स्वाधीन केला. दुधी-रुईच्या वृक्षपट्टय़ात पाच-साडेपाच हजार झाडे उभी आहेत. सर्जनाचा आनंद मिळतो आहे. ‘आपले घर’ चालवण्यात वर्दे पती पत्नी व बेंबळकर पती-पत्नी यांच्या जोडीने आम्हीही कार्यरत होतो. हळूहळू एकेक काळाच्या पडद्याआड गेले. वीणेनेही २००५ मध्ये अखेरचा श्वास घेतला.

एका विदुषीने सुचवले की ‘एकटेपण’ यावर लिहा. यावर मी लिहिले. ‘कसले एकटेपण? मी तर दोघांचे काम करतो आहे.’

chaturang@expressindia.com