परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने एखादा विषय वाचताना त्यातील महत्त्वाच्या मुद्दय़ांची संक्षिप्त टिपणे काढलेली उत्तम. त्या घटकविषयाची कमीतकमी वेळात उजळणी करण्यासाठी ही संक्षिप्त टिपणे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. एमपीएससीच्या व यूपीएससीच्या बदललेल्या परीक्षापद्धतीत तर या टिपणांचे संकलन परीक्षेच्या तयारीसाठी महत्त्वाचे असते. याचे कारण म्हणजे एमपीएससीच्या मुख्य परीक्षेत एकेका दिवशी दोन पेपर द्यावे लागतात. अशा वेळी स्वत:च्या हस्ताक्षरातील टिपणांद्वारे अभ्यासाची उजळणी करणे सहजशक्य होते.

यूपीएससीच्या अद्ययावत अभ्यासक्रमानुसार, मुख्य परीक्षेसाठी सामान्य अध्ययनाचा एकेक पेपर हा असंख्य घटकांनी- उपघटकांनी बनलेला आहे. परीक्षेच्या अखरेच्या टप्प्यात  संदर्भपुस्तकांचे सविस्तर वाचन शक्य होत नाही. अशा वेळी सुरुवातीपासून संक्षिप्त स्वरूपात टिपून ठेवलेले मुद्दे अत्यंत उपयुक्त ठरतात.

एखादा घटकविषय वाचल्यानंतर आपण काय वाचले ते आठवण्याचा प्रयत्न करावा, तसेच आपण काढलेल्या नोट्स वेळोवेळी पुन्हा वाचून त्यातील मुद्दे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करावा. स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी अशा तऱ्हेची अभ्यासपद्धत उपयुक्त ठरते.

स्पर्धापरीक्षेच्या यशासाठी दररोज किती तास अभ्यास करावा?

याबाबत अनेक समज-गरसमज आहेत. काही तज्ज्ञांच्या मते, स्पर्धापरीक्षेत यश मिळविण्यासाठी १५ ते १६ तास अभ्यास करावा लागतो, तर काहींच्या मते, आठ ते दहा तास अभ्यास पुरेसा ठरतो. मतमतांतरे कितीही असली तरी महत्त्वाचे म्हणजे, आपण किती वेळ अभ्यास केला यापेक्षा तो किती परिणामकारक पद्धतीने केला याला अधिक महत्त्व आहे.

काही विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची पद्धत मजेशीर असते. उदा. एखाद्या विषयाचा तासभर अभ्यास करायचा, तासभरानंतर थोडावेळ फिरून यायचे किंवा मित्रांसोबत गप्पा मारून परतायचे, त्यानंतर दुसऱ्या विषयाचे पुस्तक हाती घ्यायचे. त्या पुस्तकाची काही पाने वाचायची, काही वेळाने दुसऱ्याच कुठल्यातरी विषयाच्या नोट्स काढायच्या, पुन्हा अर्धा तास फिरून यायचे, नंतर चालू घडामोडींसंदर्भात एखादे पुस्तक घेऊन तीन-चार मुद्दे वाचत बसायचे. अशा पद्धतीने अभ्यास केला तर आपण खूप वेळ अभ्यास केला असे भासते खरे, पण अशा अभ्यासाने पदरी काहीच पडत नाही. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास जर अशा पद्धतीने केला तर आपण कोणत्याच विषयांवर प्रभुत्व प्राप्त करू शकत नाही आणि वेळेचा अपव्यय होतो.

स्पर्धापरीक्षेची तयारी करताना एका विषयाचे पुस्तक हातात घेतले तर ते अभ्यासून पूर्ण झाल्यानंतरच दुसरे पुस्तक वाचायला सुरुवात करा.  वाचताना  भूगोलाचे पुस्तक वाचत असाल तर पाचवी ते दहावीपर्यंतची भूगोलाची सर्व पुस्तके वाचून पूर्ण करा. त्यानंतरच दुसरा विषय अभ्यासायला सुरुवात करा. यामुळे एखाद्या विषयाचा दुसऱ्या विषयाशी असलेला संबंधही समजणे सोपे ठरते.

इतिहासाचा अभ्यास

कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने इतिहास या उपघटकाला महत्त्व आहे. काही विद्यार्थ्यांना हा उपघटक खूप सोपा वाटतो तर काहींना तो अतिशय कठीण भासतो. उदा. विज्ञान शाखेतील अनेक विद्यार्थ्यांना हा घटक अवघड वाटतो. २०११ ते २०१५ सालातील प्रश्नांचा कल लक्षात घेतल्यास या उपघटकावर साधारणत: १५ ते २० प्रश्न विचारले गेले आहेत. इतिहास या उपघटकाची तयारी करताना पूर्वपरीक्षा व मुख्यपरीक्षा डोळ्यांसमोर ठेवून तयारी केल्यास कमीत कमी वेळात उत्तम अभ्यास जमू शकतो.