चंदिगढ ते मुंबई प्रवासासाठी पुरुष संघाला खास व्यवस्था
चंदिगढ ते मुंबई हा थेट विमानाचा प्रवास तसा सव्वादोन ते अडीच तासांचा. ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या भारतीय पुरुष संघाने दुपारी अडीच तासांत हा पल्ला गाठला. मात्र वानखेडे स्टेडियमवर ३१ मार्चलाच उपांत्य फेरीचा सामना खेळणाऱ्या कॅरेबियन महिला संघाला सव्वासात तासांची वणवण सहन करावी लागली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) साठी आलेल्या पुरुष आणि महिला संघांना स्वतंत्रपणे वागणूक देत असून, एकीकडे पुरुषांना विमानातील विशेष श्रेणीने (बिझनेस क्लास) आणि महिलांना मात्र सामान्य श्रेणीने (इकॉनॉमी क्लास) प्रवास घडवला जात आहे. याबाबत आधीच विविध देशांनी नाराजी प्रकट केली आहे. रविवारी विंडीजचा महिला संघ दुपारी १२.३०चे विमान पकडून चंदिगढहून दिल्लीला जाणार होता. पण हे विमान तासभर उशिरा निघाले. मग सव्वादोन वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत विंडीज संघाला दिल्ली विमानतळावरच दुसऱ्या विमानाची वाट पाहावी लागली. त्यानंतर हे विमान अर्धा तास दिरंगाईने म्हणजेच पावणेआठ वाजता मुंबईत पोहोचले आणि त्यानंतर बसने संघाने निवासव्यवस्थेचे हॉटेल गाठले.