विराटच्या नाबाद खेळीच्या बळावर भारताने पाकिस्तानवर ६ विकेट्सने कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर विजय प्राप्त केला. विराटच्या खेळीसह आणखी काही महत्त्वाच्या गोष्टींचा भारताच्या विजयात महत्त्वाचा वाटा आहे.(Full Coverage|| Fixtures||Photos)

भारताच्या पाकविरुद्धच्या विजयाची पाच कारणे..

१. सामन्यात नाणेफेकीचा भारताच्या बाजूने लागलेला कौल हा भारतासाठी विजयाच्यादृष्टीने सर्वात पहिला शुभशकून ठरला. नाणेफेकीचा कौल जिंकल्याने धोनीला आपली रणनीती व्यवस्थितपणे अंमलात आणता आली. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी टिच्चून केलेला मारा आणि ठराविक अंतराने मिळत गेलेल्या विकेटस् हे रणनीतीप्रमाणे घडत गेल्याने भारताने पाकिस्तानला १२० धावांच्या आत रोखले.

२. गोलंदाजांचा अचूक मारा- दिवसभर आच्छादित असलेल्या खेळपट्टीचा नूर व्यवस्थिपणे ओळखून भारतीय गोलंदाजांनी केलेला अचूक मारा भारताच्या या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. पाकिस्तानच्या एकाही फलंदाजाला भारतीय गोलंदाजांनी जास्त काळ खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही आणि मोठी भागीदारीही होऊन दिली नाही. सुरूवात, मध्य आणि अंतिम सर्वच टप्प्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी त्यांना दिलेली कामगिरी योग्यप्रकारे पार पाडली.

३. विराट फॅक्टर- भारताचा तारणहार ही आपली ओळख विराट कोहलीने पुन्हा एकदा सिद्ध केली. कितीही दबावाची परिस्थिती असली तरी सुरूवातीला खेळपट्टीवर जम बसवायचा आणि मग आपल्या फटकेबाजीला सुरूवात करायची ही नेहमीची यशस्वी रणनीती विराटने या सामन्यात अवलंबिली. एका बाजूने फलंदाज बाद होत असताना विराट कोहली मैदानावर उभा राहिला. त्यानंतर युवराज आणि धोनीच्या साथीने मोक्याच्या क्षणी खेळ उंचावत त्याने भारताला विजयाच्या समीप नेऊन ठेवले.

४. पाकिस्तानी गोलंदाजांचे अपयश- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीचे स्वरूप नेहमीच भारतीय फलंदाजी विरूद्ध पाकिस्तानी गोलंदाजी असेच राहिलेले आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजीने पाकिस्तानच्या गोलंदाजीवर सरशी साधली आणि विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध अपारजित राहण्याचा विक्रम अबाधित राखला.

५. पाकिस्तानचे गचाळ क्षेत्ररक्षण- मैदानावरील क्षेत्ररक्षण हा सामन्यातील आणखी एक निर्णायक ठरलेला घटक. एकीकडे भारताच्या क्षेत्ररक्षकांनी पाकिस्तानला प्रत्येक धावेसाठी झगडायला लावून आपल्या गोलंदाजांचे मनोबल उंचावण्यास मदत केली. दुसऱ्या बाजूला सीमारेषेवर पाकिस्तानने केलेले गचाळ क्षेत्ररक्षण त्यांच्या गोलंदाजांचे खच्चीकरण करणारे ठरले. भारताच्या सुरूवातीच्या तीन विकेटस पडल्यानंतर पाकिस्तानने क्षेत्ररक्षणाद्वारे भारतीय फलंदाजांवर दबाब आणला असता तर सामन्याचा निकाल वेगळा पहायला मिळाला असता.