विश्वचषकात पाकिस्तानवरील विजयाची मालिका कायम; भारताचा सहा विकेट्स राखून दणदणीत विजय

विश्वचषक, पाकिस्तान आणि विराट कोहली हे पुन्हा एकदा भारताचे विजयाचे समीकरण ठरले. विश्वचषकाचा इतिहास बदलू, हे पाकिस्तानचे प्रशिक्षक वकार युनूस यांचे बोल त्याने खोटे ठरवले. ईडन गार्डन्सवरील मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताला पाकिस्तानविरुद्ध कधीच विजय मिळवता आला नव्हता. तो इतिहास मात्र नक्की बदलला गेला. शनिवारी रात्री ‘विजयाचा विराटाध्याय’ लिहिला गेल्यानंतर भारतीय चाहत्यांनी शानदार जल्लोष साजरा केला. पाकिस्तानच्या ११८ धावांचा पाठलाग करताना भारताने कोहलीच्या जिगरबाज नाबाद अर्धशतकाच्या जोरावर सहा विकेट्सने विजय मिळवला. (Full Coverage|| Fixtures||Photos)

ईडन गार्डन्सवर लोटलेल्या भारतीय चाहत्यांच्या निळ्या महासागराचा उत्साह काही तासांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसापेक्षा उत्कट होता. यात पाकिस्तानी चाहते मात्र ओघानेच दिसत होते. भारताच्या ढासळणाऱ्या डावाला हिंमतीने सावरत विराटने ३७ चेंडूंत ७ चौकार आणि एका षटकाराची आतषबाजी करीत नाबाद ५५ धावांची खेळी साकारली. मोहम्मद इरफानच्या १६व्या षटकात विराट विजयाच्या आवेशातच खेळला. दुसऱ्या चेंडूवर बॅकवर्ड पॉइंटला चौकार मारल्यानंतर त्याने चौथ्या चेंडूवर लाँग ऑनला षटकार खेचला. त्यानंतर स्क्वेअर लेगला एकेरी धाव घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

भारताच्या डावात रोहित शर्मा (१०) आपल्या आवडत्या स्टेडियमवर फटकेबाजीला न्याय देऊ शकला नाही. मग पाकिस्तानने मात्र फिरकीपटू इमाद वसिमला वगळून मोहम्मद समीला संघात स्थान देण्याचा निर्णय विलक्षण यशस्वी ठरला. त्याने संघाच्या पाचव्या आणि आपल्या पहिल्याच षटकात लागोपाठच्या चेंडूवर अनुक्रमे शिखर धवन (६) आणि सुरेश रैना (०) यांना तंबूची वाट दाखवली. भारताची ५ षटकांत ३ बाद २३ अशी अवस्था झाल्यावर मैदानावर शांतता पसरली. मग विराट कोहली आणि युवराज सिंगने आत्मविश्वासाने खेळपट्टीवर उभे राहात धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. शोएब मलिकच्या ११व्या षटकात विराट-युवीने १४ धावा काढल्या. विराटने एक षटकार आणि चौकार ठोकला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी रचली. वहाब रियाझला षटकार खेचण्याचा युवराजचा प्रयत्न फसला आणि सामीने त्याचा उत्तम झेल घेतला. युवीने एक षटकार आणि एका चौकारासह २३ चेंडूंत २४ धावा काढल्या. त्यानंतर विराटने धोनीच्या (नाबाद १३) साथीने भारताला विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकताच प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानला निर्धारित षटकांत ५ बाद ११८ धावसंख्येवर रोखले. याचे श्रेय अर्थातच भारताच्या फिरकी गोलंदाजांना जाते. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा आणि सुरेश रैना या तीन फिरकीपटूंनी ८ षटकांत फक्त ३६ धावा दिल्या. या तिघांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना चांगलेच चकवले. त्यांच्या मोठय़ा भागीदाऱ्या होऊ दिल्या नाही. पाकिस्तानकडून सर्वाधिक २६ धावा अनुभवी शोएब मलिकने काढल्या. त्याने १६ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह ही खेळी साकारली.

शार्जिल खान (१७) आणि अहमद शेहझाद (२५) यांनी ३८ धावांची सलामी देत पाकिस्तानला सावध सुरुवात करून दिली. रैनाच्या गोलंदाजीवर शार्जिल माघारी परतला आणि मग शाहीद आफ्रिदी (८) तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला. मात्र त्याने निराशा केली. १२व्या षटकात पाकिस्तानची ३ बाद ६७ अशी स्थिती होती. त्यावेळी हा संघ धावांचे शतक तरी ओलांडेल का, याबाबत शंका होती. मात्र शोएब आणि उमर अकमल यांनी मग धावांचा वेग वाढवला. पंडय़ाच्या १४व्या षटकात दोघांनीही एकेक षटकार खेचले. त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या १५व्या षटकात मलिकने दोन चौकार मारले.

संक्षिप्त धावफलक

पाकिस्तान : १८ षटकांत ५ बाद ११८ (शोएब मलिक २६, अहमद शेहझाद २५, उमर अकम २२, शार्जिल खान १७; सुरेश रैना १/४, रवींद्र जडेजा १/२०) पराभूत वि. भारत : १५.५ षटकांत ४ बाद ११९ (विराट कोहली नाबाद ५५, युवराज सिंग २४; मोहम्मद सामी २/१७)

सामनावीर : विराट कोहली.

एका क्रिकेटपटूला हवी तशीच ही खेळपट्टी आव्हानात्मक होती. न्यूझीलंडविरुद्धचा सामना आमच्यासाठी दु:खद स्वप्न होते. धावांचा पाठलाग करायला नेहमी आवडते. त्याने कोणत्यावेळी कशी खेळी करायची याची आकडेवारी तयार करता येते. युवराजने त्याच्या शैलीला साजेशी खेळी केली. त्याच्यासाठी ही कामगिरी आत्मविश्वास वाढवणारी आहे. सचिन तेंडुलकरला पाहत मी लहानाचा मोठा झालो आणि आज त्यांच्यासमोर विजयी खेळी केल्याचा आनंद अवर्णनीय आहे.

– विराट कोहली

धोनी आणि त्याच्या संघाचे अभिनंदन. अशा प्रकारच्या खेळपट्टीची अपेक्षा केली नव्हती. आम्ही ३० धावा अधिक केल्या असत्या तर चित्र कदाचित आमच्या बाजूने असते. अचूक मारा करण्यास गोलंदाज अपयशी ठरले. त्यात मीही आलो. विराट कोहलीने दमदार फलंदाजी केली.

– शाहिद आफ्रिदी,  पाकिस्तानचा कर्णधार

विस्मयकारक विजयासाठी भारतीय संघाचे अभिनंदन

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

या शानदार विजयाबद्दल संपूर्ण संघ आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे अभिनंदन. संपूर्ण संघाचा अभिमान आहे.

– लता मंगेशकर, गानसम्राज्ञी

भारतीय संघाचे आणि विराट कोहलीचे अभिनंदन. २००७च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक पुनरावृत्तीच्या दिशेने संघाची वाटचाल सुरू आहे. माझ्याकडून त्यांना या अभियानासाठी शुभेच्छा

– कृष्णमचारी श्रीकांत, माजी निवड समिती अध्यक्ष

महिला संघाच्या पराभवानंतर आनंद साजरा करण्याची संधी महेंद्रसिंग धोनीच्या संघाने आम्हाला दिली.

– अंजुम चोपरा, भारतीय महिला क्रिकेटपटू

सर्व भारतीयांना पाकिस्तावरील विजयाचे अभिनंदन. भारत माता की जय.

– मनोज कुमार, बॉक्सिंगपटू