ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या माजी विजेत्या संघाला कमी लेखून चालणार नाही. श्रीलंकेचा सध्याचा संघ देखील इतर कोणत्याही संघाला पराभवाची धूळ चारू शकेल, असा विश्वास संघाचा आघाडीचा फलंदाज तिलकरत्ने दिलशान याने व्यक्त केला आहे.
अफगाणिस्तानवरील विजयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता. दिलशान म्हणाला की, कोणताही संघ समोर आला तरी सहज पराभूत करू शकू अशी कुवत श्रीलंकेच्या संघात आहे. त्यामुळे या स्पर्धेची अंतिम फेरी आम्ही नक्की गाठू असा विश्वास मला आहे.
आशिया चषकात श्रीलंकेला तीन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर विश्वचषकाच्या सराव सामन्यातही श्रीलंकेच्या वाट्याला पराभव आला होता. मात्र, विश्वचषकाच्या मुख्य सामन्यात श्रीलंकेने चांगली कामगिरी करून पुनरागमन केले आहे. दिलशानने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नाबाद ८३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारून संघाला विजय मिळवून दिला होता.