भारत-बांगलादेश सामन्याचा थरार बुधवारी बंगळुरू स्टेडियमवरील प्रेक्षकांसह जगभरातील क्रिकेट रसिकांनी अनुभवला. सामन्याच्या अखेरच्या षटकातील थरार पाहून तर साऱयांच्याच हृद्याचे ठोके वाढले होते. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात भारताने बांगलादेशवर एका धावाने विजय प्राप्त केला. पण याच थरारामुळे उत्तर प्रदेशातील एका चाहत्याला आपला जीव गमवावा लागला आहे. सामना सुरू असतानाच या व्यक्तीचा हृद्यविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. (FULL COVARAGE || FIXTURES || PHOTOS )

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमधील बिस्तोली गावात राहणाऱया ओमप्रकाश शुक्ला यांना भारत वि. बांगलादेश सामन्यातील शेवटच्या षटकातील ताण पेलवला नाही. हार्दिक पंड्याने टाकलेल्या शेवटच्या षटकात बांगलादेशच्या फलंदाजाने दोन लागोपाठ चौकार ठोकल्यानंतर ओम प्रकाश यांचा रक्तदाब वाढला आणि त्यांना हृद्यविकाराचा तीव्र झटका आला. यातच त्यांचे निधन झाले. खरंतर सामना भारताने जिंकला पण हा आनंदाचा क्षण ओमप्रकाश यांना काही अनुभवता आला नाही.