मुंबईत चाहत्यांना आपल्या फटकेबाजीची भुरळ घालणाऱ्या वेस्ट इंडिजचा ‘रणगन’ अर्थात, क्रिस गेलचा सामान आता दक्षिण आफ्रिकासोबत होणार आहे. २५ मार्चला होऊ घातलेल्या सामन्यासाठी गेलची तुफानी खेळी बघण्यास आता नागपूरकरांचीही उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आपल्या उत्तुंग फटकेबाजीची ओळख जपण्यास गेलेला नागपूरची खेळपट्टी साथ देईल का, हाही प्रश्न कायम आहेच. आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकातील इंग्लंडविरुध्दच्या पहिल्याच सामन्यात गेलने फटकेबाजी करत झटपट शतक झळकावले अन् मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील ती फटकेबाजी प्रेक्षकांसाठी यादगार ठरवली. मात्र, आता नव्या खेळी खेळण्यासाठी गेल पुन्हा सज्ज झाला आहे. मात्र, बंगळुरू येथील झालेल्या दुसऱ्या सामन्यात गेलचा जादू बघायला मिळाला नाही. त्याला लक्ष्य करीत श्रीलंकेच्या गोलंदाजांनी गेलला लवकरच तंबूत पाठवले. त्यामुळे जरी गेल चालला नाही, तरी मात्र वेस्ट इंडिजने श्रीलंकेविरुध्दचा सामना जिंकला. आता नागपुरात गेलच्या फटकेबाजीकडे सर्वाचे लक्ष असणार आहे, तर त्याला आटोक्यात ठेवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला चांगलीच कसरत करावी लागणार आहे, हेही तेवढेच खरे. ज्या प्रकारे क्रिस गेलने विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांना फोडून काढले. त्यावरून तो यंदाच्या मोसमात फॉर्मात असल्याचे स्पष्ट चित्र आहे. स्टेडियमबाहेर षटकार मारण्याची क्षमता असलेल्या गेलाला थांबवण्याचे आव्हान आता दक्षिण आफ्रिकेसमोर असणार आहे. २०१३ च्या आयपीएलमध्ये गेलने अवघ्या ३० चेंडूत शतक झळकावले होते. क्रिकेटमध्ये बाप माणूस म्हणून सर्वाना परिचित गेलपासून सावधान राहण्यासाठी सर्व संघाचे कंबर कसली आहे. गेलची फटकेबाजी एकदा सुरू झाली की, समोरच्या गोलंदाजांचे धाबे दणाणल्याशिवाय तो सोडत नाही. गेलने आतापर्यंत ८१ ट्वेन्टी २० सामन्यात ३१९९ धावा आपल्या नावे केल्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिे का संघाने मुंबईत अफगाणिस्तानविरुध्दच्या सामन्यात विजय नोंदविला आहे, तर बंगळुरू येथे झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने श्रीलंकेला पराभूत करून विजय अभियान कायम ठेवले. डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज संघाने विजय मिळवून आपले मनसुबे बुलंद केलेत. स्पध्रेत आव्हान कायम ठेवण्यासाठी वेस्ट इंडिजविरुध्दच्या तिसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजय आवश्याक राहील. वेस्ट इंडिजने मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवरील पहिल्या लढतीत क्रिस गेलच्या नाबाद शतकीय खेळीच्या बळावर इंग्लंडला सहा गडय़ांनी पराभूत करून विजयी सुरुवात केली, तर बंगळुरू येथील दुसऱ्या सामन्यात श्रलंकेला सात गेडय़ांनी पराभूत करून विजय अभियान कायम ठेवले. ट्वेन्टी २० विश्वचषकाच्या स्पध्रेत आव्हान कायम ठेवाण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ प्रयत्नरत आहे. तिसऱ्या साखळी सामन्यात विजय नोंदवून उपांत्य फेरी गाठण्यासाठी वेस्ट इंडिज संघ तिसऱ्या साखळी सामन्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे जामठा येथे तीन दिवसीय सरावानंतर हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. महत्वपूर्ण असलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिज संघ उपांत्य फेरीच्या उंबरठय़ावर आहे. त्यामुळे आता परत ग्रीस गेलकडून पहिल्या सामन्यासारखी अपेक्षा संघाला असेल, तर दक्षिण आफ्रिकेला लाज राखण्यासाठी ही शेवटची संधी असेल.