भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-२० विश्वचषक २०२१ सामन्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर विराट कोहलीचा संघ पाकिस्तानविरुद्धचा नाबाद राहण्याचा विक्रम कायम ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. त्याचबरोबर बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला पहिल्यांदाच पराभूत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. क्रिकेट जाणकारांच्या मते, या हाय-व्होल्टेज सामन्यात भारतीय गोलंदाजांसाठी सर्वात मोठे काम बाबर आझमला बाद करण्याचे असेल कारण त्यावरून सामन्याची दिशा ठरणार आहे. मात्र, पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आकिब जावेद यांचे वेगळे मत मांडले आहे. त्यांनी बाबर आझम नव्हे तर दुसराच खेळाडू भारतीय संघासाठी दोखेदुखी ठरणार असल्याचे म्हटले आहे.

‘एबीपी अनकट’ शी बोलताना आकिब जावेद यांनी याबाबत भाष्य केले आहे. फखर जमान भारतीय संघाच्या गोलंदाजांसाठी मोठा धोका ठरू शकतो असे जावेद यांनी म्हटले आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने जावेद यांनी फखरच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधील दमदार कामगिरीची आठवणही करून दिली.

या सामन्यात भारताचे पारडे जड दिसत आहे, पण यावेळी पाकिस्तानचा संघही मजबूत दिसत आहे. भारताचे फिरकीपटू पाकिस्तानपेक्षा सरस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. २०१७ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात फखर जमानने शतक झळकावून पाकिस्तानला भारताविरुद्ध विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज आकिब जावेद यांनी टीम भारताला सामन्यापूर्वी जिंकण्यासाठीचे प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले. भारताची फिरकी गोलंदाजी पाकिस्तानसाठी कठीण होऊ शकते असेही ते म्हणाले. दबाव संपूर्ण भारतावर असेल कारण पाकिस्तान कधीही भारताकडून विश्वचषक जिंकणार नाही असेही जावेद म्हणाले.

भारत आणि पाकिस्तान टी -२० विश्वचषकात पाच वेळा समोरासमोर आले आहेत आणि भारतीय संघ पाचही वेळा जिंकला आहे. क्रिकेटच्या विश्वचषकात पाकिस्तान आजपर्यंत जिंकू शकलेला नाही. तर ५० षटकांच्या विश्वचषकातही भारत-पाकिस्तान सात वेळा एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले आहेत आणि तिथेही भारतीय संघाने बाजी मारली आहे.