बॉलिवूड कलाकार आपल्या चित्रविचित्र विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकांना समाजात नेमकं काय घडतंय याबाबत काहीच माहिती नसते. यामुळे बॉलिवूड कलाकारांच्या बौद्धिक क्षमतेबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. त्यांची अनेक कार्यक्रमांमध्ये खिल्ली देखील उडवली जाते. मात्र या सर्व प्रकाराला अभिनेत्री अलिया भट्ट जबाबदार असल्याचा आरोप अभिनेता अर्जुन कपूर याने केला आहे.

करण जौहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये आलियाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर तिने पृथ्वीराज चव्हाण असं उत्तर दिलं. विशेष म्हणजे यानंतर ती जोरजोरात हसू देखील लागली. यानंतर आलियाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. तिचे मिम्स व्हायरलं होऊ लागले. परंतु आलियाने दिलेल्या त्या उत्तरामुळे आता संपूर्ण बॉलिवूडलाच लोक नावं ठेवू लागले आहेत. बॉलिवूड कलाकारांना आता लोक मुर्ख समजू लागले आहेत. असे अर्जुन कपूर अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

या मुलाखतीत अर्जुनला जूहूचा पिन कोड विचारण्यात आला. यावर त्याने क्षणाचाही विलंब न करता ४०००४९ असे उत्तर दिले. या उत्तरामुळे अनुपमा देखील थोड्या चकित झाल्या. त्यांचे हावभाव पाहून अर्जुनने अलिया भट्ट आणि ‘कॉफी विथ करण’चा तो किस्सा पुन्हा एकदा सांगितला.