आयपीएलचं फॅड हळूहळू कमी होताना दिसत आहे. त्यामुळे आता ही लीग कालबाह्य़ होण्याच्या मार्गावर असल्याचंही म्हटलं जातंय. जर आयपीएलला पूर्णविराम लागला तर त्याची कारणं काय असतील याचा घेतलेला हा आढावा.

आयपीएल म्हणजे बीसीसीआयसाठी सोन्याचं अंडं देणारी कोंबडी समजली जायची, सध्या मात्र तिला तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. आता ही लीग कालबाह्य़ होण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं जातंय. त्याला तशी कारणंही आहेत.
बीसीसीआयचा सुरुवातीला ट्वेन्टी-२० क्रिकेटला विरोध होता. आम्ही पारंपरिक क्रिकेटच खेळणार, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. ट्वेन्टी-२० च्या विश्वचषकालाही बीसीसीआयने दुबळा संघ पाठवला होता. दैव बलवत्तर म्हणून भारताने हा विश्वचषक जिंकला आणि यामधला ‘धंदा’ पाहिल्यावर बीसीसीआयने आपली कूस बदलली. त्यांना ट्वेन्टी-२० क्रिकेट जास्त महत्त्वाचं वाटायला लागलं. ललित मोदी यांनी एकही पैसा खर्च न करता हजारो कोटी रुपये कमावण्याचा आयपीएल हा ‘प्रोजेक्ट’ बनवला. आयपीएलमध्ये उद्योगपती, बॉलीवूडची मंडळी आली, त्यांनी खेळाडूंसाठी बोली लावली. जिथे खेळाडू यांच्यासाठी विकला गेला तिथेच खरं तर क्रिकेटचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली.
सुरुवातीला आयपीएल म्हणजे विश्वचषकापेक्षाही काही जणांना मोठं वाटायला लागलं होतं. कारण कमी वेळात त्यांना जास्त फटकेबाजी पाहायला मिळत होती. देशाचे सामने बघण्यापेक्षा मुंबईचा, बंगळुरूचा, चेन्नईचा संघ कसा कामगिरी करतो, हे पाहणं काही लोकांसाठी महत्त्वाचं ठरत होतं. खेळ, खेळाडू सारं काही झपाटय़ाने बदलत होतं. आयपीएलमध्ये खेळलो तर आयुष्याचं सार्थक होतं, असे उदयोन्मुख खेळाडूंना वाटायला लागलं. रणजी स्पर्धाही न खेळलेले खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी काहीही करायला लागले. कारण तिथला फक्त एक सामना त्यांच्यासाठी कोटय़वधीची कमाई करून देऊ शकत होता. आपण नाव न ऐकलेले, कधीही न पाहिलेले खेळाडू आयपीएलमध्ये दिसतात, हे कुठून आले, कोणालाही माहिती नाही, असो. त्यांना निवडण्याचा निकष काय, हेदेखील माहिती नाही. पण ते कमवतायत. त्यामुळे सारं काही आयपीएलमय झालं होतं, पण फुटायचा फुगा तो फुटलाच. कारण आयपीएल म्हणजे नेमकं काय, हे त्यांना आता कुठेतरी खऱ्या अर्थाने कळायला लागलं आहे. उद्योगपती नफ्याचा विचार करणारच, त्यासाठीच ते आयपीएलमध्ये आले आहेत आणि त्यासाठी ते काहीही करून फायदा मिळवण्यासाठी कार्यरत आहेत.
आयपीएल काय आहे, हे समजून घेणं सोपं आहे. आयपीएलचा एकतरी सामना दहा षटकांमध्ये संपलाय का सांगा. आव्हान कितीही थिटं असलं तरी त्यासाठी किमान १७-१९ षटकं लागतातच. यामागे जाहिरातींचा महत्त्वाचा वाटा आहे. जर सामना दहा षटकांमध्ये संपला तर उर्वरित दहा षटकांच्या जाहिरातींचे पैसे कसे मिळणार, हे आयोजकांना चांगलंच माहिती आहे. कारण त्यांनाही हा धंदा चांगलाच जमायला लागला आहे. जाहिराती जास्त म्हणजे उत्पन्न जास्त आणि उत्पन्न जास्त म्हणजे नफा जास्त, हे सोपं गणित त्यांना कळून चुकलं आहे. त्यामुळे प्रत्येक सामना शेवटपर्यंत जातो किंवा नेतात, कोण जाणे. आणि हे आपले क्रिकेटप्रेमी वैगेरे म्हणवणारी माणसं मूर्ख बनत सामना अखेपर्यंत बघतात. आपण मूर्ख बनलेलो आहोत, हे त्यांना कळत नसतं. सामना रंजक होतोय असं त्यांना वाटतं राहतं, पण प्रत्येक सामना कसा रंजक होतो आणि अखेपर्यंत जातो, याचा विचार करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसतो. त्यांच्यासाठी क्रिकेट हा देव वगैरे आहे आणि तो देव कधीच वाईट करणार नाही, अशी त्यांची समजूत आहे. हा देव जरी वाईट करणारा नसला तरी त्याच्या आजूबाजूला असलेल्या बडव्यांनी ही बजबजपुरी बनवली आहे. बडवे ज्याप्रमाणे देवाला विकायला निघाले तसेच आयपीएलच्या बाबतीतही आहे. आयपीएलने क्रिकेटला पूर्णपणे संपवून टाकलं आहे. खेळाडूंचे फटके पाहिल्यावर तर यावर शिक्कामोर्तब करता येईल. पुस्तकामध्ये असतील तसेच फटके खेळा असं कुणाचंही म्हणणं नाही. त्यामध्ये बदल होतच असतात, व्हायला हवेतही. पण पहिल्या चेंडूपासून आयपीएलमध्ये वाकडय़ा बॅटने फटके मारले जातात, हे वाईट आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पारंपरिक क्रिकेटनेच मी धावा करतो, असं म्हणाला होता खरा, पण त्यानंतरच्याच सामन्यामध्ये त्याने वाकडय़ा बॅटने फटका मारत विकेट गमावली होती. युवा खेळाडूंचा हल्ली बचाव अभेद्य राहिलेला नाही, त्याकडे बघायलाही त्यांना वेळ नाही. कारण बॅट वाकडी करून मारल्यावर आपल्याला चौकार किंवा षटकार मिळू शकतो, हे आयपीएलने त्यांच्यावर बिंबवलं आहे. त्यामुळेच आत्ताची पिढी ही पारंपरिक फटक्यांचा सराव करण्याऐवजी वाकडय़ा बॅटने फटके मारायचा सराव करायला लागली आहे. इंग्लंडला क्रिकेटचे जनक म्हणून ओळखलं जातं. आयपीएलध्ये त्यांचे किती खेळाडू खेळतात, हा प्रश्न आहे. क्रिकेटमध्ये त्यांनी जास्त कमावलं नसलं तरी त्यांनी खेळ जपला आहे. आपण मात्र त्याचा ‘खेळखंडोबा’ करून ठेवलाय.
आयपीएलमधला ‘स्ट्रॅटेजिक टाइम आऊट’ याबाबत एकदा बीसीसीआयने स्पष्टीकरण द्यायला हवं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही रणनीती आखली जातेच ना, मग त्यांना कधी असा ब्रेक लागत नाही. मग बीसीसीआयला का लागावा, हे अनाकलनीय आहे. काही दिवसांपूर्वी आयपीएलच्या प्रत्येक सामन्याला ५०० कोटी रुपयांचा सट्टा लागतो, असे वृत्त होते. पण सामान्य माणसांपर्यंत हे अजूनही पोहोचलेलं नाही. लिलावात खेळाडू विकला गेल्यावर खेळ विकला जाणार नाही कशावरून? हळूहळू का होईना, आयपीएलचं खरं रूप सामन्यांच्या समोर यायला लागलं आहे. आयपीएलमध्ये आपल्याला मूर्ख बनवलं जातं, हे काही जणांना आता समजायला लागलं आहे, त्याचा परिणाम काही अंशी स्टेडियममध्येही पाहायला मिळतो आहे. या हंगामातील स्टेडियममधली उपस्थिती पाहिली तर हल्ली हाऊसफुल्लचा बोर्ड दिसत नाही. अर्धे स्टेडियम रिकामी दिसायला लागलं आहे. काही मालकांनी शक्कल लढवत आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना क्रिकेटच्या सामन्याच्या प्रवेशिका देऊ केल्या आहेत, त्यामुळे काही स्टेडियमवर नेहमी गर्दीच दिसते. पण चेन्नईतील सामने पाहा किंवा ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणारे राजस्थान रॉयल्सचे सामने पाहा, जवळपास र्अध स्टेडियम रिकामं दिसतं. शहाणपणा आलेले आणि आयपीएल फक्त तोंडी लावणारे चाहते आता वाढताना दिसत आहेत, त्यामुळे ते फक्त शेवटची ४-५ षटकंच सामना बघतात. या ४-५ षटकांमध्ये साऱ्या नाटय़ाचा आनंद मिळतो. त्यासाठी कशाला पूर्ण सामना बघायची गरज आहे, त्यामुळे आयपीएल आता नकोशी वाटायला लागली आहे. आवर्जून पाहावं, असं आयपीएलमध्ये काहीही दिसत नाही. त्यामुळे आता आयपीएल बंद करा, असा नारा सुरु झाला आहे.
आयपीएलनंतर चॅम्पियन्स लीगचाही प्रयोग काही वर्षांपासून सुरू आहे, पण त्या प्रयोगाचं कुणालाच सोयरसुतक नाही. आता भारतामध्ये अजून एक लीग सुरू होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. पण जिथे आयपीएलच्या लोकप्रियतेला धक्का पोहचला आहे तिथे ही लीग येऊन नेमकं काय करणार, हा प्रश्न आहे.
आयपीएलमधल्या मुंबई इंडियन्स संघाचे काही किस्से त्यांचं खरं रूप दाखवणारे आहेत. नीताबाई अंबानी यांनी ‘एज्युकेशन फॉर ऑल’ हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं आहे. या उपक्रमांतर्गत गरजू मुलांना वानखेडेवर सामना दाखवला जातो. गेल्या वर्षी या उपक्रमासाठी त्यांनी महानगरपालिकेतील मुलांना मोफत प्रशिक्षण देणाऱ्या एका प्रशिक्षकाला गाठलं. त्यांच्याकडून मुलांची माहिती मागवून घेतली आणि त्यांच्यामधली फक्त चुणचुणीत मुलं आम्ही निवडू, ही मुलं निवडण्यासाठी आम्ही एक टीम तुमच्याकडे पाठवू आणि फक्त निवडलेल्या मुलांनाच सामना दाखवू, असं सांगण्यात आलं. त्या प्रशिक्षकाने ही भेदाभेदी पाहात सरळ नकार कळवला. जिथे खेळ कसला भेदाभेद करत नाही, तिथे हा कसला बीभत्सपणा. मुंबई इंडियन्सची या वर्षांतली दुसरी गोष्ट म्हणजे, या उपक्रमाअंतर्गत ते विनामूल्य मुलांना सामना दाखवतात, असे म्हटले गेले. यावेळी तब्बल सतरा हजार मुलांना वानखेडेवर सामना दाखवण्यात आला. पण त्यामधील काही शाळांनी आणि पालकांनी आमच्याकडून प्रत्येक पाल्यासाठी पाचशे रुपये उकळण्याचा आरोप केला आहे, अशी समाजसेवा त्यांना लख लाभो, अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे.
आयपीएल बंद होणं ही काळाची गरज असली तरी ती होणार नाही. कारण आयपीएल प्रत्येक वर्षी नफा मिळवून देत आहे. इथे खेळ कोणाला महत्त्वाचा वाटतो? बीसीसीआय किंवा अन्य क्रिकेट असोसिएशमधले पदाधकारी पाहा, ते राजकारणीच आहेत. खेळाडूंनी पुढे येऊन क्रिकेट स्वच्छ करण्याची ही गरज आहे. पण हे माजी, महान क्रिकेटपटू समालोचन करण्यात, स्तंभ लिहिण्यात व्यग्र आहेत आणि त्यामध्येच ते खूश दिसतात. कारण हा सारा चिखल साफ करण्यासाठी हात घाणीत कोण घालणार, हा प्रश्न त्यांना पडला आहे. आपण जे खेळलो त्या खेळासाठी आपण काही तरी देणे लागतो, हा विचार त्यांना शिवतही नाही. जोपर्यंत माजी क्रिकेटपटू प्रशासनात येत नाही तोपर्यंत यामध्ये कोणताच बदल होणार नाही. माजी क्रिकेटपटूंनी त्यांचा संघ बनवावा, बीसीसीआयच्या निवडणुकीत उतरावा आणि जिंकावं, हाच विजय भारताच्या क्रिकेटला तारू शकतो, नाही तर आयपीएमधल्या खेळाडूंना महान क्रिकेटपटू म्हणायला वेळ लागणार नाही.
प्रसाद लाड