भारतात सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोनपैकी एक असलेली शाओमी ही कंपनी सध्या चर्चेत आहे. शाओमी ही कंपनी भारतातील व्यवसाय बंद करून पाकिस्तानात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यासह, भारत सरकारने या कंपनीला लक्ष्य केल्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचाही दावा केला जात आहे. नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊया. गेल्या काही काळापासून शाओमी इंडिया ही कंपनी भारत सरकारच्या एजन्सीच्या रडारवर आहे. कंपनीकडून कर आणि रॉयल्टीच्या रकमेमध्ये झालेली गफलत यामुळे या कंपनीवर सरकारचे कडक लक्ष आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीने शाओमीला ५,५५१ कोटी रुपयांचा निधी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान काही तासांपूर्वी सोशल मीडियावर धक्कादायक ट्विट व्हायरल झाले आहेत. साऊथ आशिया इंडेक्स नावाच्या ट्विटर हॅण्डलवरून हे ट्विट्स करण्यात आले आहेत. यामध्ये त्यांनी, शाओमी इंडिया भारतातील आपला व्यवसाय पाकिस्तानात हलवणार असल्याचं म्हटलं आहे. काही सूत्रांच्या हवाल्याने हे ट्विट करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. साऊथ आशिया इंडेक्सच्या ट्विट्समध्ये म्हटलंय, चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमी आपला प्रकल्प भारतातून पाकिस्तानात हलवणार आहे. भारत सरकारने त्यांची मालमत्ता जप्त केल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. ‘WhatsApp पासून दूर राहा’; टेलिग्रामच्या संस्थापकाने का दिला असा सल्ला, जाणून घ्या दरम्यान, या ट्विट्सवर आता शाओमी इंडियाची प्रतिक्रिया आली आहे. कंपनीने म्हटलंय, की ही माहिती पूर्णपणे चुकीची आणि आधारहीन आहे. शाओमीने जुलै २०१४ मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता. यानंतर अवघ्या वर्षभरात कंपनीने आपला 'मेक इन इंडिया'चा प्रवास सुरु केला. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आजच्या घडीला कंपनीतील ९९% स्मार्टफोन्स आणि १००% टीव्हीचे उत्पादन भारतात होते. शाओमीने पुढे म्हटलंय, "एक जागतिक कंपनी म्हणून, खोट्या दाव्यांपासून आमच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व आवश्यक उपाययोजना करू." काही महिन्यांपूर्वीच ईडीने शाओमीचे ५,५५१ कोटी रुपयांचा निधी जप्त करण्याचे आदेश जारी केले होते. त्याला आता फेमा सक्षम प्राधिकरणाची (FEMA Competent Authority) मान्यता मिळाली आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, शाओमीने रॉयल्टीच्या नावावर अनेक गैरप्रकार केले आहेत. यानुसार कंपनीने रॉयल्टीच्या नावावर स्वतःच्या संलग्न बँकेला पैसे पाठवले आहेत.