आज देशात मोबाइलधारकांची संख्या अब्जावधीमध्ये गेली आहे. याचबरोबर इंटरनेट आधारित उपकरणांची संख्याही दिवसागणिक वाढू लागली आहे. यामुळे ही सर्व उपकरणे वापरणाऱ्या ग्राहकांना चांगली सेवा देणे हीदेखील कंपन्यांची गरज बनली आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात ग्राहकांचे समाधान ही सर्वात महत्त्वाची बाब बनली आहे. यामुळे उत्तम ग्राहक सेवा देण्यासाठी यामध्ये नवसंशोधन होणे आवश्यक आहे. या संदर्भात बीटूएक्स या बहुराष्ट्रीय सेवा कंपनीचे मुख्याधिकारी दीप पंत यांच्याशी केलेली बातचीत.

  • मोबाइल ग्राहकांना सेवाक्षेत्र किती विस्तारले आहे. यामध्ये नवीन काय सुरू आहे.

उत्तर : सध्या भारतीय बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणावर स्मार्टफोन येत आहेत. याचबरोबर स्मार्टफोन आणि मोबाइलधारकांना चांगली सेवा देणे हे कंपन्यांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. कारण सध्या ग्राहक चांगल्या उत्पादनाची निवड ही उत्पादन खरेदीनंतर मिळणाऱ्या सेवेच्या दर्जावर करत असतो. यामुळे चांगली सेवा देण्यासाठी सर्वच कंपन्या झटत आहेत. यामध्ये नवीन कल्पनाही येऊ लागल्या आहेत. बीटूएक्स या बहुराष्ट्रीय कंपनीने नुकतेच गुगलसोबत सहकार्य करार करून घरपोच सेवा देण्याचे मान्य केले आहे. आज बाजारात मोबाइल आणि इंटरनेट आधारित उपकरणांची उलाढाल ही ५० अब्ज डॉलर्स इतकी आहे. याचा दहा टक्के भाग म्हणजे सुमारे पाच अब्ज डॉलर्स हा सेवाक्षेत्राचा वाटा आहे. भविष्यात इंटरनेट आधारित उपकरणांमध्ये वाढ होणार असून फोनच्या संख्येतही वाढ होणार आहे. यामुळे साहजिकच सेवाक्षेत्राचा हिस्साही मोठा होत जाणार आहे. २०२५ पर्यंत सेवाक्षेत्र आणि उपकरणांच्या एकूण उलाढालीच्या २० ते २५ टक्के हिस्सा मिळवू शकेल, असा आमचा अंदाज आहे.

  • तुम्ही गुगलसोबत नवकल्पना घेऊन सेवाक्षेत्रात काय प्रयोग केला आहे?

उत्तर : गुगल या आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डने भारतात सेवा देण्यासाठी बीटूएक्स या कंपनीशी सहकार्य करार केला आहे. या करारानुसार आम्ही गुगल पिक्सेल ग्राहकांना घरपोच सेवा देणार आहोत. ग्राहकाने गुगलच्या सेवा केंद्राकडे तक्रार नोंदविली की ती आमच्या ग्राहक सेवा केंद्राकडे वळविली जाईल. यानंतर आमचा प्रशिक्षित तंत्रज्ञ त्या व्यक्तीशी संवाद साधून त्याच्या फोनमध्ये नेमकी काय समस्या आहे हे जाणून घेईल. त्यानुसार तंत्रज्ञ दुरुस्तीसाठी आवश्यक ते सामान घेऊन ग्राहकाच्या घरी पोहचेल. तेथे जर त्याच्याकडून दुरुस्ती नाही झाली तर तो फोनमधील सर्व माहितीचा बॅकअप गुगल ड्राइव्हवर घेईल आणि तुमची कोणतीही माहिती नसलेला फोन सेवा केंद्रात घेऊन येईल. सुट्टय़ा भागांच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त सात दिवसांच्या आत फोनची दुरुस्ती करून तो फोन पुन्हा ग्राहकाच्या घरी घेऊन जाऊन त्याला त्याच्या बॅकअपची सर्व माहिती फोनमध्ये रीस्टोअर करून दिली जाईल. अशा प्रकारे प्रथमच कोणत्याही फोनसाठी सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

  • ही सेवा तुम्ही सध्या सेवा पुरवीत असलेल्या इतर मोबाइल कंपन्यांसाठी लागू करता येणार आहे का?

उत्तर : आम्ही सॅमसंग अ‍ॅपलपासून ते अगदी शिओमीपर्यंत अनेक ब्रॅण्ड्ससाठी सेवा पुरवठादार कंपनी म्हणून काम करत आहोत. प्रत्येक कंपनीच्या गरजेनुसार आम्ही सेवा देणार आहोत. गुगलच्या ग्राहकांसाठी देण्यात आलेला सेवेचा पर्याय इतर कंपन्यांना त्यांच्या ग्राहकांसाठी देण्याची इच्छा असल्यास आम्ही तो उपलब्ध करून देऊ शकतो.

  • या क्षेत्रात सध्या चांगल्या करिअर संधी आहेत. पण आपल्याकडे प्रशिक्षित तंत्रज्ञ मिळतात का?

उत्तर : आपल्याकडे प्रशिक्षित तंत्रज्ञ मिळणे ही खूप अवघड बाब आहे. सध्या जे तंत्रज्ञान आपण वापरत आहोत ते दुरुस्त करण्यासाठी आपल्याकडे प्रशिक्षित तंत्रज्ञांची कमी जाणवते. याचबरोबर त्यांना चांगले प्रशिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमाचीही वानवा जाणवते. यामुळेच आम्ही केंद्र सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत एक अभ्यासक्रम विकसित करत असून त्याद्वारे प्रशिक्षित तंत्रज्ञांची फौज विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्या आम्ही खासगी स्तरावर हे प्रयत्न करत आहोत.

  • या क्षेत्रात सध्या काय आव्हाने आहेत असे तुम्हाला वाटते.

उत्तर : सरकारी पातळीवर नियमांमध्ये काही प्रमाणात पारदर्शकता आणणे आवश्यक आहे. तसेच सरकारने जुना मोबाइल नवीन करून विकण्यास परवानगी द्यावी असे आम्हाला वाटते. तसेच या क्षेत्रात येत्या काळात मोठय़ा प्रमाणावर करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. तर या संधींचा फायदा घेण्यासाठी सरकारने धोरण तयार करावे जेणेकरून जास्तीत जास्त तरुणांना याचा लाभ घेता येऊ शकेल.