किल्ल्यांची मोठमोठी प्रवेशद्वारं पाहून आपण अचंबित होतो. त्यांचा उपयोग नेमका कसा केला गेला असेल याबद्दल तर्कवितर्क करायला लागतो. पण किल्ल्यांबाबत आपल्याला समोर दिसणाऱ्या गोष्टींपलीकडेही अनेक बाबी असतात. त्यांच्यावर प्रकाशझोत-

मेळघाट अभयारण्यात येणाऱ्या नरनाळा किल्ल्याच्या पायथ्याशी वनखात्याचे सर्व सोपस्कार पार पाडून किल्ला चढायला सुरुवात केली. फेब्रुवारी संपत आला होता, त्यामुळे सकाळीही उन्हाची तीव्रता जाणवत होती. किल्ला चढून धापा टाकत महाकाली दरवाजासमोर उभे राहिलो आणि अवाक झालो. या जंगलात इतका सुंदर दरवाजा पाहायला मिळेल याची कल्पनाही केली नव्हती. भव्य दरवाजा, (प्रवेशद्वाराची उंची ३७ फूट असून कमानीची उंची १५ फूट आहे.) दरवाजाच्या बाजूच्या बाहेर आलेले सज्जे, द्वारपट्टीवर एखादी नक्षी वाटावी असा कोरलेला फारशी शिलालेख सर्वच अप्रतिम.

Dried pods of opium, Dhule, opium Dhule,
धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित
bhau rangari ganpati temple fire marathi news
भाऊ रंगारी गणपती मंदिराजवळील जुन्या लाकडी वाड्याला आग
navi mumbai, Valve Repair, Traffic Congestion, footpath close, Pedestrian Woes, kopar khairane, teen taki area, marathi news,
व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद
Leopard in Vasai Fort area fear among citizens
वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून शोध सुरू

किल्ल्यांची प्रवेशद्वारं आपल्याला नेहमीच नतमस्तक करतात. या प्रवेशद्वारांनी अनेक गोष्टी पाहिलेल्या असतील. शत्रूने केलेला निकराचा हल्ला, जय-पराजय, विजयाच्या मिरवणुका, फंदफितुरीने न लढताच उघडलेले दरवाजे. सणासुदीला सजलेले दरवाजे अशा कित्येक गोष्टी प्रवेशद्वारात बसले की डोळ्यासमोर तरळून जातात.

दगड-विटा-चुन्याच्या तटबंदी बुरुजांनी अभेद्य असलेल्या किल्ल्याचे प्रवेशद्वार हे मात्र किल्ल्याच्या अभेद्यतेतला एक नाजूक भाग असतो. त्यामुळे प्रवेशद्वार बांधताना स्थपतीला नेहमीच विशेष काळजी घ्यावी लागत असे. ज्याप्रमाणे किल्ल्याचे प्रवेशद्वार शत्रूच्या हल्ल्याला तोंड द्यायला सक्षम पाहिजे, तसेच ते सुंदर आणि भारदस्तही हवे. जेणेकरून किल्ल्यात येणाऱ्या सामान्य माणसाला एकाच वेळी भारावून टाकलं पाहिजे आणि त्याच्या बुलंदपणाचं, अभेद्यपणाचं त्याच्यावर दडपणही आलं पाहिजे.

रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्रात प्रवेशद्वार कसे असावे, कुठे असावे, त्याच्या संरक्षणासाठी कोणत्या गोष्टी असाव्यात या संदर्भात विस्तृत विवेचन केलेल आहे.

‘दरवाजे बांधावे, ते खालील मारा चुकवून पुढे बुरूज देऊन, येतिजाती मार्ग बुरुजाचे आहारी पडोन दरवाजे बांधावे. किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे. याकरिता गड पाहून, एक, दोन, तीन दरवाजे बांधावे. दरवाजापुढे अथवा तटाखाली मदानभूमी लागते, म्हणजे तो गड भुईकोटात दाखल जाहला. आला गनिम त्यांनी दरवाजास तटास लागावे असे होते. ही गोष्ट बरी नव्हे. याकरिता या जातीचा किल्ला असेल त्यास आधी सर्व प्रयत्ने दरवाजापुढे तटाखाली जितके मदान असेल तितका खंदक खोल आणि रुंद खणून तटाचे पायी दुसरा पडकोट मजबूत बांधोन त्यावर भांडी (तोफा), जंबुरे (छोटय़ा तोफा) ठेउन खंदकाच्या कडेस एकाएकी परकी फौज येउन न पावे असे करावे.’

भुईकोटाचे प्रवेशद्वार बनवताना जास्त काळजी घ्यावी लागते. भुईकोटाच्या तटिभतीपासून तसेच प्रवेशद्वारापासून शत्रूला दूर ठेवण्यासाठी खंदक खोदले जात. त्या खंदकावर काढता-घालता येण्याजोगा पूल असे. प्रवेशद्वाराला बुरुजांचे संरक्षण दिलेले असे. बऱ्याच भुईकोटांमधे प्रवेशद्वारासमोर बुरूज येईल, असे बांधकाम केलेले आढळते. या रचनेमुळे प्रवेशद्वाराचे थेट माऱ्यापासून संरक्षण होत असे. परांडा किल्ला, शिरगावचा किल्ला या किल्ल्यामध्ये खंदक आणि दरवाजाला झाकणारे बुरूज अशी रचना पाहायला मिळते.

किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराला संरक्षण देण्यासाठी परकोट किंवा उपकोटाची उभारणी केली जाते. चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचं ठिकाण. या ठिकाणाला भेट देणाऱ्याच्या यादीत गाविलगड किल्ला असतो. या किल्ल्याच्या बाहेर असलेला खंदक त्याला वेढणारी तटबंदी, प्रवेशद्वार पाहून संपूर्ण किल्ला पाहिल्याच्या आनंदात पर्यटक परत जातात. पण वस्तुत: हा गाविलगड किल्ल्याचा परकोट आहे. मुख्य किल्ला पाहण्यासाठी परकोटाचा डोंगर उतरून खाली जावं लागतं. अंजनवेलचा किल्ला (गोपाळगड), बाणकोटचा किल्ला इत्यादी किल्ल्यांनाही परकोट आहेत. किल्ल्यात शिरलेल्या शत्रूला परतवून लावायची आणखी संधी या परकोटामुळे नक्कीच मिळत असेल.

संरक्षणासाठी प्रवेशद्वारासमोर िभत बांधून तयार केलेल्या दरवाजाला जिभीचा दरवाजा म्हणतात. विजयदुर्ग किल्ल्यावर अशा प्रकारचा दरवाजा पाहायला मिळतो. सुवर्णदुर्ग किल्ल्यावरही प्रवेशद्वाराच्या रक्षणासाठी, त्यावर थेट मारा होऊ नये यासाठी किनाऱ्यावर बांधलेल्या िभतीचे अवशेष पाहायला मिळतात.

देवगिरीचा किल्ला, त्याभोवतालीचा खंदक, त्यावरील पूल ही रचना सुपरिचित असली तरी पुन्हा पुन्हा पाहण्यासारखी आहे. छोटय़ा टेकडय़ांवर बांधल्या जाणाऱ्या किल्ल्यावरही अशा प्रकारच्या रचना पाहायला मिळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यतील भरतगड, भगवंतगड, यशवंतगड हे किल्ले छोटय़ाशा टेकडीवर बांधलेले आहेत. त्यांचे संरक्षण करण्यासाठी टेकडीवर प्रवेशद्वाराच्या जवळ खंदक खोदलेले पाहायला मिळतात.

अंकाई-टंकाई हे जोड किल्ले छोटय़ा डोंगरांवर आहेत. त्यातील अंकाई किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी सात दरवाजांची योजना केलेली आहे. त्यातील पाच दरवाजे किल्ल्याच्या चढावर एकामागोमाग एक बांधलेले आहेत. दोन्ही बाजूंनी तटबंदी आणि अनियमित उंची असलेल्या पायऱ्यांचा ८० अंशांतला चढ चढताना जीव मेटाकुटीला येतो. प्रवेशद्वाराजवळील  अनियमित उंचीच्या पायऱ्या अंधारे बोळ अशा प्रकारच्या रचना शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी जाणूनबुजून बनवल्या जात. याचप्रमाणे नरनाळा किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी पूर्वीच्या काळी शहानुर दरवाजा, मेहंदी दरवाजा आणि महाकाली दरवाजा अशा तीन दरवाजांची माळ ओलांडून जावे लागत असे.

एकामागोमाग एक प्रवेशद्वारे बनवताना काही किल्ल्यांमध्ये ती एकमेकांशी काटकोनात बांधली जात असत. अशा प्रकारे प्रवेशद्वारे बांधताना दुसरे प्रवेशद्वार हे पहिल्या प्रवेशद्वारापेक्षा उंचीवर बांधले जात असे. त्यामुळे पहिले प्रवेशद्वार पडल्यास आत शिरणाऱ्या शत्रूसन्यावर तटा, बुरुजा, प्रवेशद्वाराआडुन हल्ला करता येत असे. तसेच उंचीवर बांधलेल्या दुसऱ्या प्रवेशद्वारामुळे उंचीचा फायदा घेऊन शत्रुला टिपणे, किल्ल्यातून मारा करणाऱ्या सनिकांना सोपे जात असे. अशा प्रकारच्या प्रवेशद्वारांची रचना अंतुर, गाविलगड, यशवंतगड इत्यादी किल्ल्यांवर पाहायला मिळते.

उस्मानाबाद जिल्ह्य़ातील बोरी नदीच्या काठावर बांधलेल्या रामदुर्ग (रणमंडळ) या किल्ल्याचे प्रवेशद्वार उतार असलेल्या खडबडीत नदीपात्राला लागून बनवलेले आहे. नदीपात्रातील दगड ज्या ठिकाणी व्यवस्थित आहेत तेथे तो मुद्दाम फोडून ओबडधोबड करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे प्रवेशद्वार संरक्षित करण्यासाठी नदीपात्राचाच खंदकासारखा उपयोग केलेला येथे पाहायला मिळतो.

औरंगाबाद जिल्ह्य़ातील सुतोंडा (नायगाव) किल्ल्याचे प्रवेशद्वार मोठय़ा खुबीने बनविलेले आहे. येथे डोंगर उतारावरचा कातळ खोदून अंदाजे ५० फूट लांब, २० फूट रुंद व २० फूट उंच खाच (खिंड) बनवलेली आहे. या ठिकाणचा अंदाजे १७०० टन वजनाचा दगड फोडून किल्ल्याच्या बांधकामात वापरण्यात आला असावा. शत्रूला फसविण्यासाठी ही मानवनिर्मित खाच (खिंड) कातळात बनविण्यात आली होती. िखडीच्या डोंगराकडील भागात कातळ कोरून १२ फूट उंच पश्चिमाभिमुख द्वार बनविलेले आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस जेथे कातळ संपतो तेथे तटबंदी बांधलेली आहे. तटबंदीत डाव्या बाजूला शरभ शिल्प कोरलेले आहे, तर उजव्या बाजूच्या कोपऱ्यात तोफेसाठी गोल छिद्र (झरोका) ठेवलेले आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस दरवाजाच्या व अडसराच्या खाचा कोरलेल्या पाहायला मिळतात. दरवाजातून आत गेल्यावर कातळात कोरलेला भुयारी मार्ग काटकोनात वळतो. येथे पहारेकऱ्यांसाठी कट्टे आहेत. भुयारातून बाहेर पडून फरसबंदी मार्गाने पुढे जाऊन डाव्या बाजूला वळून वर चढून गेल्यावर आपण िखडीच्या वरच्या बाजूला येतो. येथून या मानवनिर्मित िखडीचा किल्ल्याच्या संरक्षणासाठी कसा उपयोग केलेला आहे याचा अंदाज येतो. या खाचेच्या (खिंडीच्या) दोन्ही बाजूंना उंचावर बुरूज व तटबंदी, तर तिसऱ्या बाजूला खोल दरी आहे. अरुंद पायऱ्यांवरून शत्रू या िखडीत आल्यावर दोन्ही बुरुजांवरून त्यांच्यावर मारा करणे सहज शक्य होते. समोरच्या बाजूला खोल दरी व मागील बाजूस असलेल्या अरुंद पायऱ्यांमुळे शत्रूची या ठिकाणी (खाचेत) कोंडी होत असे, त्याच्या हालचालींवर मर्यादा येत असत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गबांधणीत अनेक प्रयोग केले. त्यांपकी गोमुखी प्रवेशद्वार ही एक अजोड रचना आहे. या रचनेत दोन बुरुजांच्या मध्ये किल्ल्याचे प्रवेशद्वार लपवलेले असते. या रचनेमुळे किल्ल्याचे प्रवेशद्वार नेमके कोठे आहे ते चटकन लक्षात येत नाही. कळल्यास प्रवेशद्वारावर थेट मारा करता येत नाही. शत्रू येनकेन प्रकारे दरवाजाजवळ आला तर, तो दोन बुरुजांमधून तटबंदीने युक्त असलेल्या नागमोडी वाटेने दरवाजासमोर येतो. त्या वेळी दरवाजा झाकणारा बुरूज शत्रुसन्याच्या पिछाडीला येतो आणि दरवाजाच्या बाजूचा बुरूज समोर येतो. त्यामुळे शत्रूसन्य मागच्या आणि पुढच्या बाजूनेही किल्ल्यावरील सनिकांच्या माऱ्यात येते. तटबंदी, बुरुजावरील जंग्यामधून बाण, बंदुकी, जळते बोळे इत्यादींच्या सहाय्याने त्यांच्यावर मारा करता येतो. प्रवेशद्वारासमोर पुरेशी  मोकळी जागा नसल्याने शत्रूला हत्ती किंवा ओंडक्याच्या साहाय्याने दरवाजावर धडका देता येत नाहीत. तरीही शत्रू प्रवेशद्वारास झोंबला तर त्यावर असलेल्या जंग्यांतून उकळते तेल, निखारे टाकून शत्रूला नामोहरम करता येते. ही गोमुखी रचना शिवनिर्मित रायगड आणि सिंधुदुर्ग किल्ल्यांवर ठळकपणे पाहता येतात.

शिवनिर्मित प्रतापगडावर चढावर बनवलेल्या प्रवेशद्वारांची रांग पाहता येते. यातील पहिले प्रवेशद्वार जमिनीपासून काहीसे उंचावर बनवलेले आहे. ते चढण्यासाठी अनियमित उंचीच्या पायऱ्या बांधलेल्या होत्या. या रचनेमुळे दरवाजाजवळ पोहोचलेल्या शत्रुसन्याला हत्तीच्या सहाय्याने दरवाजावर धडका देणे शक्य नव्हते तसेच ओंडक्यांनी दरवाजावर धडका देणे जवळजवळ अशक्य होते. पद्मदुर्गावरही अशा प्रकारची रचना पाहायला मिळते.

शिवाजी महाराजांनी किल्ल्यावरील प्रवेशद्वाराकडे येणाऱ्या वाटेची रचनाही शत्रूला नामोहरम करता येईल अशी केली होती. प्रवेशद्वाराकडे येणारी वाट अशा प्रकारे बनवली जात असे की, ती थेट प्रवेशद्वाराकडे न जाता तटबंदी व बुरुजांना वळसा घालून जात असे. किल्ल्यावर येणाऱ्या शत्रूच्या उजव्या बाजूला तटबंदी व बुरूज येतील अशी रचना केलेली असे. या रचनेमुळे प्रवेशद्वाराकडे जाताना शत्रुसन्य किल्ल्यावरून माऱ्याच्या टप्प्यात राहत असे. उजव्या हातात तलवार आणि डाव्या हाताला ढाल बांधलेल्या सनिकांवर उजव्या बाजूने मारा झाल्यावर साहजिकच डाव्या हाताला बांधलेली ढाल तो मारा चुकवण्यासाठी उजव्या बाजूला घेत असे. त्याच वेळी तलवारीवर दगड लागून तिची धार बोथट होऊ नये म्हणून ती डाव्या बाजूला घेत असे. अशा अवघडलेल्या अवस्थेत चालतांना बाजूने होणारा मारा चुकवत अनियमित उंचीच्या पायऱ्या चढताना सन्याची लय पूर्ण बिघडून जात असे. प्रतापगड, सिंहगड, पन्हाळगड, रायगड इत्यादी किल्ल्यांवर केवळ प्रवेशद्वाराकडे येणारी वाट नियोजनपूर्वक बांधून शिवाजी महाराजानी शत्रूला किल्ल्यात सहजासहजी प्रवेश करता येणार नाही याची सोय करून ठेवली होती.

प्रवेशद्वाराची कमान साधारणपणे १५ ते २० फूट उंचीची असते. प्रवेशद्वार मुख्यत: लाकडापासून बनवली जात. त्यावर ठरावीक अंतरांवर लोखंडी पट्टय़ा मारल्या जात. यामुळे दरवाजाला मजबुती येत असे. या पट्टय़ांवर टोकदार खिळे बसवलेले असत. हत्तीने किंवा ओंडक्याने धडका देऊन दरवाजा फोडता येऊ नये यासाठी दरवाजांवर खिळे मारले जात असत. खिळ्यांच्या आकार, लांबी आणि रचनेनुसार डभोई, गोवळकोंडा, बीदर, विजापूर, नगर, पुणे, दिल्ली, चितोड असे खिळ्यांचे विविध प्रकार आहेत. दरवाजाच्या मागच्या आतील बाजूस अडसर सरकवण्याची सोय केलेली असे. दरवाजाच्या बाजूच्या दोन्ही िभतींत त्यासाठी ठेवलेल्या खोबण्या दरवाजे अस्तित्वात नसेल तरी आजही अनेक ठिकाणी पाहता येतात. तसेच दरवाजा व्यवस्थित उघड बंद होण्यासाठी खालच्या आणि वरच्या बाजूस अशी दोन बिजागरीसाठी भोके बनवलेली जात. प्रत्येक दरवाजाला साधारणपणे तीन फूट उंचीचा एक छोटा िदडी दरवाजा असे. किल्ल्यात येण्या-जाण्यासाठी त्याच दरवाजाचा वापर केला जात असे. यशवंतगड किल्ल्याला चार दरवाजे आहेत. त्यातील तिसऱ्या दरवाजामध्ये एक अनोखी रचना पाहायला मिळते. या ठिकाणी िदडी दरवाजा मुख्य दरवाजात न बनवता दरवाजाच्या डाव्या बाजूच्या बुरुजात बनवलेला आहे. एखाद्या छोटय़ा भुयारासारख्या असणाऱ्या या मार्गाला आतील आणि बाहेरील अशा दोन्ही बाजूंस दरवाजा बसवण्याची सोय आहे. िदडी दरवाजामुळे मुख्य दरवाजा काहीसा कमकुवत बनतो. ते टाळण्यासाठी यशवंतगडावर केलेली बुरुजातल्या िदडी दरवाजाची रचना एकदा तरी पाहण्यासारखी आहे

संपूर्ण प्रवेशद्वार एखाद्या सणाला किंवा राजाच्या मिरवणुकीसाठीच उघडले जात असे. किल्ल्यात केवळ सूर्योदय ते सूर्यास्त या वेळेतच प्रवेश दिला जात असे. याच नियमामुळे हिरकणीच्या कथेचा जन्म शिवाजी महाराजांच्या काळात झाला. काही किल्ल्यांच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असतो. रायगड, सिंधुदुर्ग इत्यादी गडांच्या प्रवेशद्वारावर नगारखाना पाहायला मिळतो. प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूस पहारेकऱ्यांना आराम करण्यासाठी जागा असे. त्यास देवडी म्हणतात.

चोरदरवाजा

चोरदरवाजाबद्दल रामचंद्रपंत आमात्यांनी आज्ञापत्रात पुढिल उल्लेख केलेला आहे. ‘गड पाहून एक, दोन, तीन दरवाजे तशाच चोरिदडय़ा करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व चोरिदडय़ा चिणून टाकाव्यात. याविरहित बलकुवलीस चोरवाटा ठेवाव्या. त्या सर्वकाळ चालू देउ नयेत. समयास तेच िदडी दरवाजाचा राबता करून सांजवादा चढवीत जावे.’

किल्ला शत्रूच्या हातात पडण्याची शक्यता निर्माण झाली किंवा दीर्घकाळ चालणाऱ्या वेढय़ातून राजकीयदृष्टय़ा महत्त्वाच्या व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी, तसेच रसद पुरवण्यासाठी चोरवाटा आणि चोरदरवाजांचा उपयोग होत असे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी रायगडावर हल्ला केला तेव्हा राजाराम महाराज चोरदरवाजाने निसटले आणि जिंजीला पोहोचून त्यानी औरंगजेबाविरुद्धच्या मराठय़ांच्या युद्धाचे नेतृत्व केले.

किल्ल्याला एक किंवा अनेक चोरवाटा ठेवलेल्या असत. किल्ल्यावरील ठरावीक लोकांनाच त्याचा ठावठिकणा माहिती असे. किल्ल्याला साधारणपणे एक किंवा दोन चोरदरवाजे असत. चोरदरवाजे साधारणपणे दोन ते तीन फूट उंच आणि दोन फूट रुंद असतात. बुरुजाच्या तळाला, तटबंदीच्या वळणावर प्रवेशद्वारापासून दूर आणि चटकन नजरेत न येणाऱ्या जागी चोरदरवाजांची रचना केलेली आढळते. सध्या किल्ल्यांवर दिसणारे चोरदरवाजे सताड उघडे दिसतात; परंतु त्या काळी ते चिणून टाकलेले असत. त्यामुळे ते बुरुजाचा किंवा तटबंदीचाच भाग असल्यासारखे दिसत, वेगळे ओळखता येत नसत.

सुधागड किल्ल्यावरचा बुरुजाच्या तळाशी असलेला चोरदरवाजा आणि त्यासाठी बुरुजात कोरून काढलेला जिना आवर्जून पाहण्यासारखा आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याला ‘राणीची वेळा’ या किल्ल्याच्या मागच्या बाजूला असणाऱ्या पुळणीवर जाण्यासाठी तटबंदीत चोरदरवाजा ठेवलेला आहे. अनेक वेळा सिंधुदुर्ग पाहूनही एकच चोरदरवाजा आहे असा माझा समज होता. सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बाजूला स्क्युबा डायव्हिंग करतात. ते करायला गेलो तेंव्हा तिथे एक चोरदरवाजा आढळला. त्याची रचना अशी केली आहे की, तो समुद्राच्या पाण्याच्या पातळीत असल्यामुळे त्या दरवाजाला थेट होडी लागू शकते. साताऱ्याजवळील वर्धनगडाच्या तटबंदीत असलेल्या चोरदरवाजाचे स्थानही पाहण्यासारखे आहे. कल्याणजवळील मलंगगडावरचा चोरदरवाजा चक्क कातळात कोरून काढलेला. सुवर्णदुर्ग किल्ल्याचा कमानीयुक्त जिना असलेला चोरदरवाजा सुंदर आहे. किल्ल्यांवरचे चोरदरवाजे शोधून काढायला एक वेगळीच मजा येते. चोरदरवाजामधून गडाखाली उतरणाऱ्या वाटा आज बेलाग झालेल्या आहेत. डोंगर-भटक्यांनी या वाटा शोधण्याचा प्रयत्न केल्यास तेही एक चित्तथरारक साहस ठरेल.
अमित सामंत – response.lokprabha@expressindia.com