चार हजारांहून अधिक जणांचा मृत्यू

ठाणे : जिल्ह्यातील करोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत असून दररोज १ हजार ७०० हून अधिक नागरिकांना करोनाची बाधा होऊ लागली आहे. वाढत्या संसर्गामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ७० हजार ३३४ नागरिकांना करोनाची लागण झाली असून ४ हजार ३६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई या तीन शहरांमध्ये चाचण्यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे संसर्गाचे प्रमाणही सर्वाधिक आहे.

ठाणे जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात काहीसा नियंत्रणात आलेला करोनाचा संसर्ग सप्टेंबर महिन्यात पुन्हा वाढला आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई ही तीन शहरे प्रामुख्याने करोनाची केंद्रे बनली आहेत. दररोज जिल्ह्यात १ हजार ७०० हून अधिक रुग्ण आढळून येत असून त्यापैकी साधारण एक हजार रुग्ण ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईतील असतात असे रोजच्या अहवालावरून स्पष्ट होते.

उपचाराधीन रुग्णांत वाढ

सप्टेंबरमध्ये जिल्ह्यात करोना संसर्गाचे प्रमाण वाढल्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. सध्या जिल्ह्यात १७ हजार ७३६ उपचाराधीन रुग्ण आहेत. या रुग्णांमध्ये कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक ४ हजार २७५, ठाण्यात ३ हजार ७७४, नवी मुंबईतील ३ हजार ४६३, ठाणे ग्रामीणमधील २ हजार ५११, मीरा-भाईंदरमधील १ हजार ९३३, उल्हासनगरमधील ६०१, अंबरनाथमधील ४४०, बदलापूरमधील ४०२ आणि भिवंडीतील ३३७ रुग्णांचा समावेश आहे.

ठाणे शहरातील रुग्णांमध्येही वाढ

ऑगस्ट महिन्यामध्ये ठाणे शहरातील करोना संसर्ग काहीसा आटोक्यात येऊ लागला होता. त्यामुळे शहरात दररोज २०० हूनही कमी रुग्ण आढळून येत होते. या काळात अतिसंक्रमित भाग असेलेल्या कोपरी, लोकमान्यनगर, सावरकरनगर, घोडबंदर परिसर आणि कळवा या भागांमधील रुग्णसंख्याही घटली होती. मात्र, सप्टेंबरमध्ये ठाणे शहरातील संसर्गामध्ये पुन्हा वाढ झाली. या महिन्याच्या सुरुवातील शहरात ३०० हून अधिक रुग्ण आढळून येत होते. सध्या हे प्रमाणत ४०० हून अधिक झाले असून शहरातील कोपरी, लोकमान्यनगर, सावरकरनगर, घोडबंदर आणि कळवा या संक्रमित क्षेत्रांमध्ये रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. तर, मुंब्रा आणि वागळे इस्टेटमध्ये रुग्णांचे प्रमाण तुलनेने कमी आहे.

शहर                        करोनाबाधित     मृत्यू

* कल्याण-डोंबिवली      ४१,६६६        ८१२

* ठाणे                            ३५,६५३        ९७७

* नवी मुंबई                     ३५,५५२        ७३६

* मीरा-भाईंदर                १७,८५५        ५५०

* ठाणे ग्रामीण                  १३,७३०        ३९४

* उल्हासनगर                  ९,०४२        २९१

* अंबरनाथ                       ६,१४२         २२४

* बदलापूर                         ५,९४१         ७७

* भिवंडी                          ४,९५३         ३०४

* एकूण                       १,७०,३३४       ४,३६५