शहराच्या खड्डेमुक्तीसाठी एमएमआरडीएचे नियोजन भिवंडी-निजामपुरा महापालिकेच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शहराच्या विकासावर होणारा प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन राज्य सरकारने भिवंडी शहराच्या विकासासाठी जाहीर केलेल्या विशेष आर्थिक पॅकेजमधून महापालिका हद्दीतील सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने घेतला आहे. भिवंडी शहरातील तब्बल ५२ प्रमुख रस्त्यांची या कामासाठी निवड करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील १२ प्रमुख रस्त्यांसाठी तब्बल १२० कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला असून उर्वरीत रस्त्यांच्या उभारणीसाठी आणखी दोन टप्पे आखण्यात आले आहेत, अशी माहिती महानगर विकास प्राधिकरणातील सूत्रांनी दिली. काँक्रीटीकरणाचा हा एकूण प्रकल्प ३०० कोटी रुपयांच्या घरात जाऊ शकतो, असे सूत्रांनी स्पष्ट केले. भिवंडी तसेच आसपासच्या परिसरात राज्य सरकारने विकास केंद्र, लॉजिस्टिक पार्क, मेट्रो प्रकल्प अशा योजनांची आखणी केली आहे. यादृष्टीने पावलेही टाकण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पायाभूत सुविधांचा अभाव हा या प्रकल्पांच्या मार्गातील मोठा अडथळा आहे. राजकीय अस्थिरता आणि करवसुलीच्या आघाडीवर महापालिकेला आलेले अपयश यांमुळे नियोजनाच्या आघाडीवर भिवंडी शहर पुरते फसले आहे. याचा फटका विकास प्रकल्पांना चालना देताना बसू शकतो, हे हेरून राज्य सरकारच्या सूचनेनुसार एमएमआरडीएनेच आता या शहराच्या पायाभूत विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. भिवंडी महापालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी विशेष पॅकेज आखले असून मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून येथील कामे केली जाणार आहेत. मात्र ही कामे वारंवार करावी लागू नयेत यासाठी महानगर विकास प्राधिकरणाने संपूर्ण महापालिका हद्दीतील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. भिवंडी महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एवढय़ा मोठय़ा संख्येने रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली असून पहिल्या टप्प्यात १२ प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएमधील वरिष्ठ सूत्रांनी लोकसत्ताशी बोलताना दिली. एमएमआरडीएने आखलेल्या योजनेनुसार महापालिका हद्दीतील तब्बल ५२ प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १२ रस्त्यांसाठी १२० कोटी रुपयांच्या निविदा टप्प्याटप्प्याने काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. ५२ रस्त्यांपैकी २९ रस्त्यांचे काँक्रीटीकरण प्राधान्याने केले जाणार असून दुसऱ्या टप्प्यात आणखी १७ रस्त्यांच्या निविदा काढल्या जातील, असे सांगण्यात आले. या २९ रस्त्यांसाठी तब्बल ३०० कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले असून उर्वरीत २३ रस्त्यांचे अंदाजपत्रक अद्याप तयार करण्यात आलेले नाही. निविदा प्रक्रिया उरकून पावसाळ्यापूर्वी ही कामे सुरू करायची आणि पुढील दोन वर्षांत शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करायचे, असे एमएमआरडीएचे नियोजन आहे.