ठाणे स्थानक परिसरात १५ धूळप्रदूषण नियंत्रण यंत्रे

वाढते बांधकाम प्रकल्प आणि रस्त्यांवरील वाहतूक यांमुळे ठाणे शहरात धुळीचे प्रमाण वाढत असताना, नागरिकांच्या आरोग्याला निर्माण होत असलेला धोका दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. हवेतील धूलिकण शोषून शुद्ध हवा बाहेर सोडणारी यंत्रणा बसवण्याची घोषणा करणाऱ्या महापालिका प्रशासनाने या प्रकल्पाची सुरुवात ठाणे रेल्वे स्थानकाजवळील सॅटिस भागातून करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी १५ धूळशोषक यंत्रणा बसवण्याचे काम आज, शुक्रवारपासून सुरू करण्यात येत आहे. येत्या काळात ठाणे शहरात २०० ठिकाणी अशी यंत्रे बसवण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक अशी ठाण्याची ओळख आहे. मध्य रेल्वे प्रशासनाच्या एका अहवालानुसार ठाणे रेल्वे स्थानक परिसरात दररोज तब्बल सहा लाख प्रवाशांची ये-जा असते. स्थानकालगत रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून वाहनतळाचे बांधकाम सुरू आहे. तसेच बसगाडय़ांतूनही मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्यामुळे हा परिसर मोठय़ा प्रमाणात प्रदूषित झाला आहे. धूलिकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी सॅटिस भागात १५ ठिकाणी आठवडय़ाभरात धूळशोषक यंत्रे बसवण्यात येणार आहेत, असे पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाच्या मुख्य नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितले. सॅटिसवर प्रत्येक तीस फुटांच्या अंतरावर ही बसविण्यात येतील. काही दिवसांपूर्वी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पुढाकाराने रेल्वे स्थानकाजवळील गोखले रोड येथे प्रायोगिक तत्त्वावर धूळ प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविण्यात आली होती. या यंत्राच्या माध्यमातून ४५ टक्के प्रदूषण कमी झाले, असा दावा प्रधान यांनी केला आहे.

कसे आहे यंत्र?

हवेतील धूलिकण शोषून शुद्ध हवेचा झोत सोडण्याचे काम हे यंत्र करते. पालिकेच्या वतीने बसविण्यात येणारे हे यंत्र पाच फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. यंत्रात विशिष्ट प्रकारचे पंखे बसविण्यात आले आहेत. मानवी आरोग्यास हानीकारक असलेले हवेतील २५ ते ५० मायक्रॉन आकारमानाचे धूलिकण या उपकरणातील फिल्टरद्वारे शोषले जाते व शुद्ध हवा बाहेर सोडली जाते.