ठाणेकरांमध्ये वृक्ष, वनस्पतींविषयी असलेले आकर्षण गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वृक्षवल्ली प्रदर्शनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिसून आले. या प्रदर्शनाच्या निमित्ताने झालेल्या खरेदीतून ही बाब स्पष्ट झाली आहे. वृक्षवल्ली प्रदर्शनातील ४५ हून अधिक स्टॉल्समधून नागरिकांनी सुमारे २५ लाखांपेक्षा अधिक रकमेची फुलझाडे, शोभिवंत वनस्पती आणि भाजीपाल्याच्या झाडांची खरेदी केली.
सुमारे ५५ हजाराहून अधिक ठाणेकरांनी या प्रदर्शनाला भेट दिली. रसिकांचा हा प्रतिसाद पाहून महापालिकेने हे प्रदर्शन एक दिवस वाढविण्याचा निर्णय घेतला. शुक्रवार ते रविवारी मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर सोमवारीही वनस्पती खरेदीचा ठाणेकरांचे प्रमाण मोठे होते, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेचे उद्यान अधिकारी दिनेश गावडे यांनी दिली. ठाण्यातील गावदेवी मैदानाच्या प्रांगणामध्ये ‘वृक्षवल्ली’ प्रदर्शनाची सुरूवात झाली.
ठाण्याचे महापौर संजय मोरे, महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल, अभिनेत्री-अभिनेते दांपत्य अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याला सुरुवात झाली.  
प्रदर्शनाबरोबरच खरेदीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या प्रदर्शनाला पहिल्या दिवसापासुनचा ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता.
बोन्सायचे आकर्षण.
१२ वर्षांचा इटुकला वड, २० वर्षांचे छोटे पिंपळ वृक्ष, आंबा, नारळ, चिकू, डाळींब, खजूर यांची बोन्साय केलेली झाडे प्रदर्शनातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. डोंबिवलीतील संजीव वैद्य यांच्या नर्सरीमध्ये तयार करण्यात आलेल्या छोटय़ा बोन्साय वृक्षांची खरेदीही ग्राहकांनी केली. वही झाडे अवघ्या दोन ते तीन फुटांपेक्षा उंच नसल्याने घरामध्ये शोभेसाठी त्यांना पसंती मिळत होती.