डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांच्या विकासासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेने या भागासाठी स्वतंत्र्य विभाग कार्यालय स्थापण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्यालयामार्फत या भागातील दैनंदिन नागरी सुविधांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे, तसेच अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याकडे या विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला असून निवडणुकीसाठी या ठिकाणी नव्या प्रभागांच्या निर्मितीची प्रक्रियाही लवकरच हाती घेतली जाणार आहे.
डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांमधील संघर्ष समितीचा या गावांचा महापालिकेत समावेश करण्यास विरोध केला असला तरी महापालिकेने मात्र येथील सुविधांसाठी कंबर कसली आहे. संघर्ष समितीच्या संघर्षांच्या इशाऱ्यानंतरही महापालिकेनेही या गावांमध्ये वेगाने विकासकामे करण्याचा जणू चंग बांधला असून यासाठी स्वतंत्र्य प्रभाग समितीची रचना गावांसाठी करण्यात आली आहे. या गावांसाठी स्वतंत्र ‘ई’ प्रभाग स्थापन करण्यात आला आहे.
’२७ गावांमधील ग्रामपंचायतीमधील दप्तरांसह सर्व प्रकारची सामुग्री पालिका अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीत जाऊन ताब्यात घ्यावी असा अध्यादेश महापालिका आयुक्त मधुकर अर्दड यांनी काढला आहे.
’या गावांसाठी प्रभाग क्षेत्रामध्ये वाढ केली आहे. कल्याण जवळील काही गावे ‘ड’ प्रभाग क्षेत्रामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
’आजदे गावाचा ‘फ’ क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे.
उरलेल्या १७ गावांसाठी स्वतंत्र नवीन ‘ई’ प्रभाग क्षेत्र करण्यात
आले आहे.
’कल्याण-डोंबिवली महापालिकेत सात प्रभाग क्षेत्र आहेत, आता ‘ई’ प्रभाग क्षेत्राचा त्यात समावेश झाल्याने प्रभाग क्षेत्रांची संख्या आता आठ झाली आहे.
’‘ई’ प्रभाग क्षेत्र कार्यालय डोंबिवली येथील सावळाराम म्हात्रे क्रीडासंकुलात स्थापन करण्यात येणार आहे.