भरधाव वाहनांचा वेग कमी व्हावा आणि पादचाऱ्यांना रस्ता ओलांडता यावा, यासाठी ठाणे महापालिकेने थ्रीडी झेब्रा क्रॉसिंगचा प्रयोग शहरात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने कळवा-खारेगाव परिसरातील एका रस्त्यावर थ्रीडी झेब्रा क्रॉसिंग तयार करण्यात आले आहे. थ्रीडी झेब्रा क्रॉसिंगमुळे गतिरोधकाचा भास होत असल्यामुळे चालकवाहनांचा वेग कमी करतील आणि संभाव्य अपघात टळून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे सहज शक्य होईल, असा त्या मागचा उद्देश आहे.

अचानक रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंगचा उंचवटा दिसला तर चालक साहजिकच वाहनाचा वेग कमी करतात. काही महिन्यांपूर्वी अहमदाबाद येथील माय-लेकींनी मिळून ही परदेशातील थ्रीडी झेब्रा क्रॉसिंगची कल्पना अमलात आणली होती. याच पाश्र्वभूमीवर कळवा येथील खारेगावातील कै.चाऊ दादा पाटील मार्ग येथे थ्रीडी झेब्रा क्रॉसिंगचा प्रयोग करण्यात आला आहे. महापालिकेतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद इताडकर यांनी हे थ्रीडी झेब्रा क्रॉसिंग तयार केले आहे.

भरधाव वाहन चालविणाऱ्यांना

चाप बसावा आणि वाढते अपघात टाळावेत, या उद्देशाने थ्रीडी झेब्रा क्रॉसिंगचा उपयोग होतो. स्पीड ब्रेकरऐवजी थ्रीडी झेब्रा क्रॉसिंग उपयुक्त ठरत असल्याने केंद्रीय रस्ते विकास आणि राजमार्गमंत्री नितीन गडकरी यांनी अनेक शहरांमध्ये त्याचा वापर करा, असे सांगितले आहे. अपघातांची पाश्र्वभूमी लक्षात घेता वेगाने धावणाऱ्या वाहनांना मंदगतीवर आणण्यासाठी या थ्रीडी झेब्रा क्रॉसिंगचा विधायक वापर होऊ शकतो.

अपघाती गतिरोधकांवर पर्याय

ठाण्यातील विविध रस्त्यांलगत शाळा, रुग्णालय, धार्मिक स्थळे असून येथे नागरिकांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे या भागात वाहनांच्या वेगाला प्रतिबंध बसावा म्हणून गतिरोधक बसविण्यात आले आहेत. त्यापैकी बहुतेक गतिरोधक शास्त्रोक्त पद्धतीने तयार करण्यात आलेले नाहीत.

असे आहे थ्रीडी झेब्रा क्रॉसिंग

परदेशातील शहरांमध्ये अशा प्रकारचे थ्रीडी झेब्रा क्रॉसिंग पद्धत आहे. सपाट रस्त्यांवर काळ्या-पांढऱ्या रंगाचे पट्टे काढून त्या पट्टय़ांनी समांतर, असा तिरकस पिवळ्या रंगाचा पट्टा आखला जातो. लांबून पाहिल्यास रस्त्यावर उंचवटा असल्याचा भास होतो. त्यामुळे वाहनचालक आपल्या वाहनाचा वेग कमी करतात.

झेब्रा क्रॉसिंगमुळे सगळ्यांचाच फायदा होणार आहे. तसेच त्यामुळे गाडी चालवताना धक्के लागणार नाहीत. त्यामुळे अपघात टाळता येतील. महापालिका आयुक्त संजय जयस्वाल यांनी शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा देण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यातलाच हा एक भाग आहे.

-आदित्य देशमुख, नागरिक, कळवा