ठाणे : करोनाकाळामध्ये मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ण सुरळीत नसली तरीही रेल्वेमार्गावर रेल्वे रूळ ओलांडणे, रेल्वेमार्गातून चालणे यामुळे ठाणे ते कसारा आणि वांगणी भागात ५० अपघातांची नोंद झाली आहे. या अपघातांमध्ये मृतांचे प्रमाण ४५ आहे. यातही पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. अपघातांची सरासरी काढल्यास प्रत्येक दोन दिवसांत एकाचा अपघातामुळे बळी गेल्याचे समोर येत आहे. करोनाकाळातही रेल्वे अपघात घडत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मध्य रेल्वेमार्गावर अपघातांचे प्रमाण सर्वाधिक असते. दरवर्षी मध्य रेल्वेमार्गावरील ठाणे ते कसारा आणि वांगणी भागात ३ हजार अपघात घडतात. यामध्ये दररोज सरासरी एक किंवा दोन अपघात हे रेल्वेतून पडणे, रूळ ओलांडणे, रेल्वेमार्गातून चालणे, खांबाला धडक यामुळे घडलेले असतात. ठाणे ते कसारा आणि वांगणी रेल्वे स्थानक हद्दीत रेल्वे रूळ ओलांडणे, रेल्वे मार्गातून चालणे यामुळे ५० अपघातांची नोंद करण्यात आलेली आहे. या अपघातात ५ जण जखमी, तर ४५ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यातील जूनमध्ये ११, जुलैमध्ये १६ आणि २३ अपघातांचा समावेश आहे. महिने मृत्यू जखमी जून ११ ०० जुलै १६ ०० ऑगस्ट १८ ०५ एकूण ४५ ०५