नियमित वेळापत्रक पाळण्यात कमालीचा ढिसाळपणा दाखवणाऱ्या मध्य रेल्वेने प्रशासनाने अपघातग्रस्तांना नुकसानभरपाई देण्यातही अशीच उदासीनता दाखवली आहे. मध्य रेल्वेच्या रुळांवर, फलाटांवर, गाडय़ांमध्ये अपघाताने जखमी होणाऱ्यांची संख्या वाढत असताना गेल्या पाच वर्षांमध्ये साडे पाच हजारांहून अधिक प्रवाशांना अद्यापि रेल्वेतर्फे नुकसानभरपाई मिळू शकलेली नाही. प्रत्येक वर्षी सरासरी एक हजार अपघातग्रस्त प्रवासी नुकसानभरपाईसाठी अर्ज करत असताना त्यातील काही टक्केच प्रवाशांना नुकसानभरपाई मिळत असल्याचे आता उघड होत आहे.
मुंबई आणि उपनगरातून प्रवास करणाऱ्या रेल्वेप्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अपुऱ्या लोकल सेवेमुळे गर्दी वाढून अपघाताच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. गर्दीमुळे चालत्या गाडीतून पडणारे, गाडी आणि फलाटाच्या पोकळीतून पडून जखमी आणि मृत्युमुखी पडणाऱ्या प्रवाशांना रेल्वे कायद्यानुसार नुकसानभरपाई देणे रेल्वेला बंधनकारक आहे. प्रतीवर्षी यासंबंधीचे एक हजाराहून अधिक अर्ज रेल्वेकडे भरपाईसाठी दाखल होत असतात. मात्र दरवर्षी दाखल होणाऱ्या अर्जातील काही ठरावीक अर्जदारांना भरपाई दिली जाते. ठाण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते अॅड. सुयश प्रधान यांनी रेल्वे प्रशासनाकडे याविषयीची माहिती मागितली होती. रेल्वेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. पाच वर्षांत ५ हजार ७९२ अपघातग्रस्त प्रवासी किंवा त्यांचे कुटुंबीय या भरपाईपासून वंचित आहेत.
२०१० मध्ये ३ हजार पाचशे ३९ जण भरपाईच्या प्रतीक्षा यादीत होते. त्यांमध्ये सातत्याने वाढत होत गेली असून २०११ मध्ये ३ हजार सातशे ४०, २०१२ मध्ये ४ हजार दोनशे ४३, २०१३ मध्ये ५ हजार एकशे ८९ पर्यंत ही प्रतीक्षा यादी वाढत गेली. तर २०१४ मध्ये हा आकडा ५ हजार सातशे ९२ पर्यंत पोहचला आहे. तर प्रत्येक वर्षी दाखल होणारे अर्जही हजार ते पंधराशेच्या दरम्यान आहेत. २०१० मध्ये एक हजार दोनशे ९४ नुकसानभरपाईसाठी अर्ज आले होते. २०११ मध्ये १ हजार तीनशे ५२, २०१२ मध्ये एक हजार पाचशे ११, २०१३ मध्ये एक हजार पाचशे ६३ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. तर २०१४ मध्ये एक हजार १४५ अर्ज रेल्वेकडे आले असल्याची माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे.

भरपाईचे वास्तव..
वर्ष भरपाईसाठीचे देण्यात आलेली भरपाईच्या
अर्ज नुकसानभरपाई प्रतीक्षेतील प्रवासी
२०१० १२९४ ६५१९.६१ लाख ३५३९
२०११ १३५२ ४१९९.९७ लाख ३७४०
२०१२ १५११ ३८५४.४८ लाख ४२४३
२०१३ १५६३ १८३४.२६ लाख ५१८९
२०१४ ११४५ ७४३.६७ लाख ५७९२

अपघातग्रस्थांची ससेहोलपट..
रेल्वे कायद्यानुसार रेल्वेचा प्रवासी असलेल्या अपघातग्रस्ताला भरपाई देणे रेल्वेला बंधनकारक असून अपघातामध्ये रेल्वेची चूक आहे किंवा नाही याच्या प्रक्रियेत अडकून पडणे चुकीचे आहे. तांत्रिक बाबींच्या पूर्ततेत अडकल्यामुळे रेल्वे प्रवाशांना मदत मिळवण्यात दिरंगाई होत असून त्याचा फटका अपघातग्रस्त जखमी किंवा मृत व्यक्तीच्या कुटुंबाला सहन करावा लागतो. त्यामुळे अपघातग्रस्तांचे हाल होत असून हे हाल थांबवण्यासाठी जलद प्रक्रिया रेल्वे प्रशासनाने सुरू करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया अॅड. सुयश प्रधान यांनी केले. यासंबंधी मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंग यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.