ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांपासून करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सोमवारी शहरात रुग्णसंख्येने १ हजाराचा आकडा ओलांडला. यानंतर मंगळवारी तब्बल ६२ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत, त्यामुळे शहराची एकूण रुग्णसंख्या १०७३ वर पोहचली आहे. याचसोबत शहरात आज आणखी एका रुग्णाला आपले प्राण गमवावे लागले असल्यामुळे मृतांचा आकडा १८ वर पोहचला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने १९६८ लोकांना घरात क्वारंटाइन केलं आहे. मंगळवारी पॉजिटीव्ह आलेल्या ६२ अहवालांपैकी ४५ रुग्ण हे याआधी करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आले होते. १० रुग्णांच्या संसर्गाचं कारण समजू शकलेलं नसून इतर रुग्ण हे अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईच्या दिशेने प्रवास करत असल्याचं पुढे आलंय. आतापर्यंत ५०६ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले असून अद्याप ५८ जणांचे अहवाल येणं बाकी असल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती आहे. शहरातील रुग्णांवर पालिकेच्या रुग्णालयासह उल्हासनगर, डोंबिवली, ठाणे आणि मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.