ठाणे जिल्ह्यातील महत्वाच्या शहरांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अंबरनाथ शहरात गुरुवारी एकाच दिवशी ७३ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. आतापर्यंत शहरात एकाच दिवशी करोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडल्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आज पॉजिटीव्ह आलेले सर्व रुग्ण हे समुह संसर्गातले आहेत. आतापर्यंत अंबरनाथ शहरात करोनाबाधितांची संख्या २८७ वर पोहचली असून, ७ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच १२१ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. पण एकाच दिवसात समुह संसर्गातून सर्वाधिक लोकांना करोनाची लागण झाल्यामुळे प्रशासनासमोरची चिंता वाढली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाने १९ रहिवासी संकुल प्रतिबंधित केली आहेत. अंबरनाथ शेजारील बदलापूर शहरातही आज ५ करोनाचे रुग्ण सापडले आहेत.