सर्वेक्षणानंतर तात्काळ कारवाईचे आयुक्तांचे प्रशासनाला निर्देश कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत २९७ धोकादायक तर ३३८ अतिधोकादायक इमारतींची यादी महापालिकेने जाहीर केली आहे. यासंबंधी नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर ही यादी जाहीर करण्यात आली असून ज्या ठिकाणी रहिवाशी राहात नाहीत त्या तातडीने निष्काषित करण्याचा निर्णय आयुक्त ई.रिवद्रन यांनी घेतला आहे. याशिवाय ज्या इमारतींमध्ये रहिवाशांचे वास्तव्य आहे तेथे नोटिसा पाठवून पुढील कार्यवाही हाती घेण्याचे आदेशही आयुक्तांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील ६३५ धोकादायक इमारतींमधील रहिवासी तसेच मालकांना इमारत धोकादायक असल्याच्या नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. इमारत रिकामी केली जावी असेही नोटिशीत स्पष्ट करण्यात आले आहे. इतर इमारतींचे सर्वेक्षण करून नोटिसा बजाविण्याची कार्यवाही सुरूच ठेवण्याचे आदेश रिवद्रन यांनी दिले. धोकादायक इमारतीसंदर्भात आयोजित बैठकीला अतिरिक्त आयुक्त संजय घरत, उपायुक्त सुरेश पवार व सात प्रभागांचे प्रभाग क्षेत्र अधिकारी उपस्थित होते. पाऊस सुरू असताना इमारत पडल्याची दुर्घटना घडल्यास तातडीने मदत कार्यासाठी पालिकेचे एक विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहे. हे पथक आपत्ती निवारणासाठी तैनात असणार आहे. अतिधोकादायक इमारतीमध्ये रहिवासी राहत असतील तर त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करण्यासाठी नगररचना विभागातील अधिकाऱ्यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तसेच या कामासाठी वास्तुविशारद संघटनेचे सहकार्य घेऊन टिटवाळा, कल्याण, डोंबिवली परिसरात धोकादायक इमारतीमधील रहिवाशांचे तात्पुरते स्थलांतर करता येईल का, याची चाचपणी करण्यात येईल. त्यामुळे धोकादायक इमारती पाडण्याचे काम सुलभ होईल. संजय घरत, अतिरिक्त आयुक्त