बदलापूर : बदलापूरजवळ असलेल्या कान्होर गावाजवळ छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यावर बदलापूर ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत कत्तल झालेली २० जनावरे आढळली, तर पोलिसांनी ४८ जिवंत जनावरे ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. बदलापूर येथील कान्होर गावाजवळ एका जंगलात जनावरे आणली जात असल्याची माहिती कुळगाव पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा होताच मुरबाडचे उपपोलीस अधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मदतीने कुळगाव पोलिसांनी त्या ठिकाणी छापा घातला. पोलिसांनी ख्वाजा कुरेशी याला ताब्यात घेतले, तर त्याच्या इतर साथीदारांनी या ठिकाणाहून पळ काढला. पोलिसांनी कत्तलखान्यातून अंदाजे २० जनावरांचे अवशेष आणि ४८ जिवंत जनावरे ताब्यात घेतली. कत्तल केलेल्या जनावरांचे मांस आसपासच्या शहरांमध्ये विक्रीसाठी नेले जात असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. याप्रकरणी प्राणी संरक्षण कायदा आणि इतर कलमान्वये कुळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.