२३ गोदामे, १२५ झोपडय़ांवर हातोडा भिवंडी येथील कशेळी भागातील शासकीय जमिनींवर बेकायदा उभारण्यात आलेली २३ गोदामे शुक्रवारी महसूल विभागाने जमीनदोस्त केली. ठाणे येथील कळवा भागातील ७२ एकर भूखंडावर उभारण्यात आलेल्या १२५ झोपडय़ांवरही पालिकेच्या पथकाने कारवाई केली. भिवंडी येथील कशेळी भागातील सव्र्हे क्रमांक १९३ या शासकीय जमिनीवर बेकायदा बांधकामे करण्यात आल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या होत्या. जिल्हा प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी या बांधकामांची पाहाणी केली होती. त्यामध्ये शासकीय जमिनीवर सहा गोदामे बेकायदा उभारण्यात आल्याचे, तर १७ गोदामांची बांधकामे अंशत: शासकीय जमिनीवर असल्याचे समोर आले होते. ही जमीन खाडीकिनाऱ्यापासून जवळ असल्यामुळे या बांधकामांसाठी खाडीकिनारी भराव टाकण्यात आल्याचे पाहाणीतून उघड झाले होते. ठाण्याचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश महसूल विभागाला दिले होते. त्यानंतर महसूल विभागाने संबंधित मालकांना आठ दिवसांपूर्वी नोटिसा बजावल्या आणि त्यानंतर शुक्रवारपासून भिवंडीचे प्रांताधिकारी संतोष थिटे आणि तहसीलदार शशिकांत गायकवाड यांच्या पथकाने कारवाई सुरू केली. भिवंडीतील कशेळी आणि काल्हेर परिसर आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अखत्यारीत येत असल्यामुळे महसूल विभागाने कारवाईसाठी एमएमआरडीएची मदत घेतली होती. या कारवाईसाठी एमएमआरडीएने महसूल विभागाला साहित्य पुरविले होते. तसेच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता. प्रस्तावित व्यावसायिक संकुलाचा भूखंड मोकळा कळवा खाडीकिनारी ७२ एकरांचा शासकीय भूखंड असून त्यावर वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर व्यावसायिक संकुल उभारण्याची योजना प्रस्तावित आहे. या मोकळ्या भूखंडावर गेल्या काही महिन्यांपासून झोपडय़ा उभारण्यात येत होत्या. एक ते दीड लाख रुपयांमध्ये झोपडय़ांची विक्री केली जात असल्याची चर्चा होती. या संदर्भात ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर पालिका प्रशासनाने या भूखंडावरील झोपडय़ांवर कारवाई केली. या कारवाईमध्ये एकूण १२५ झोपडय़ा जमीनदोस्त करण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.