स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने खलाशांचे प्राण वाचले धाकटी डहाणू येथील भानुदास गजानन तांडेल यांची भाग्यलक्ष्मी ही मासेमारी करणारी बोट रविवारी दुपारी खोल समुद्रात वादळी वारे आणि लाटांमुळे उलटली. तब्बल २० तासांनंतर मंगळवारी दुपारी ही बोट डहाणू बंदरात सुखरूप पोहचली. या बोटीत तांडेल यांच्यासह ११ खलाशी होते. आजूबाजूच्या बोटी आणि त्यावरील मच्छीमार यांच्या मदतीमुळे या बोटीवरील खलाशांना वाचवण्यास यश आले. भाग्यलक्ष्मी बोटीमध्ये भानुदास तांडेल, जयवंत तांडेल, नरेश दवणे, तुळशीदास तांडेल, संजय काटेला, राहुल ठाकरे, नीलेश वळवी, अजय वरक, महेश मानकर, गणपत हाडळ, राध्या वळवी हे मच्छीमार होते. डहाणू बंदरातून ही बोट १९ ऑगस्ट रोजी दुपारी मासेमारीला गेली असता रात्री साडेआठच्या सुमारास समुद्रात उसळलेल्या मोठय़ा लाटांमुळे बोटीमध्ये पाणी शिरून ती उलटली. त्यानंतर बोटीवरील तांडेल यांनी वायरलेसवरून दुसऱ्या बोटीला दुर्घटनेची माहिती दिली. बोट उलटल्यानंतर पेटीमध्ये हवा राहिल्यामुळे ती तरंगू लागली. त्याचा फायदा घेत तांडेल यांनी बोटीच्या टपावर बॅटरी घेऊन उभे राहिले. २० मिनिटांनंतर आनंद अंभिरे यांची पवनसाई ही बोट मदतीसाठी पोहोचली. दरम्यान, बोटीमधील खलाशी पाण्यात पोहू लागले. तब्बल पाऊण तास ते समुद्रात पोहत होते. पवनसाईबरोबर महालक्ष्मी, जलसागर, तुळजा भवानी या बोटीही मदतीसाठी धावल्या. पवनसाई बोटीने दिवसरात्र मदतकार्य करून भाग्यलक्ष्मी बोटीला मंगळवारी दुपारी दोन वाजता किनाऱ्यावर आणले. दिवसा बोट खेचायची आणि रात्रीच्या सुमारास मदतकार्य थांबवून समुद्रात मुक्काम करावा लागे, असे पवनसाई बोटीचे मालक आनंद अंभिरे यांनी सांगितले. सरकारकडून नेहमी मच्छीमारांना उपेक्षाच पदरात पडत आली आहे. वेळीच सरकारी मदत मिळाली असती तर ही दुर्घटना घडली नसती. शासनाने गांभीर्याने याचा विचार करण्याची गरज आहे. -तानाजी तांडेल, मच्छीमार, डहाणू