पालिका कर्मचारी कचरा उचलत नसल्याचा आरोप

वसई : वसई-विरार शहरातील पूर ओसरला असला तरी शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. साचलेल्या पाण्यामुळे कचरा सडला असून दुर्गंधीचा त्रास वसईकरांना सहन करावा लागत आहे. हा कचरा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर उचलावा, अशी मागणी वसईकरांनी केली आहे.

पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या वसईवर रोगराईचा मोठे संकट येऊ  घातले आहे. जागोजागी कचरा, चिखल आणि डबकी तयार झाली आहेत. या चिखलामुळे आणि डबक्यात साचलेल्या पाण्यामुळे साथीचे आजार तसेच भयंकर रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वसई पूर्वेच्या वालीव येथील धुमाळनगर येथे मुख्य रस्त्यावरच कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. रस्त्याच्या कडेला टाकलेला कचरा थेट रस्त्यावर आला आहे. या भागातही जागोजाही चिखल आणि पाण्याचे डबके आहे. पालिका दररोज कचरा उचलला जात असल्याचा दावा करत असते. मात्र साचलेला कचरा पालिकेचा दावा खोटा ठरवत आहे.

नालासोपारा बस आगार तर चिखलाचा आगार बनलेला आहे. साचलेल्या चिखलातून वाट काढणेही प्रवाशांना कठीण झाले आहे. याच मार्गातून नालासोपारा रेल्वे स्थानकात दररोज हजारो प्रवासी जात असतात. परंतु चिखल काढण्याची कुठलीच व्यवस्था करण्यात आलेली नाही.

पालिकेची तयारी

रोगराई पसरू नये यासाठी  पालिकेच्या आरोग्य विभागाने कंबर कसल्याचे सांगितले आहे. आम्ही पुरानंतर साचलेला कचरा रोजच्या रोज उचलत आहोत, तसेच रोगराई पसरू नये यासाठी साठलेल्या डबक्यात औषधांची फवारणी करत असल्याचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी सांगितले. आम्ही शहरातील साचलेले पाणी काढण्यासाठी मुंबई महापालिकेकडून १३ आणि पालिकेचे १७ असे मिळून ३० पंप दररोज वापरत आहोत. आतापर्यंत ३१९ रहिवाशी संकुलांच्या टाक्या टीएलसी पावडरची फवारणी करून पालिकेने स्वच्छ करून दिल्या आहेत, असेही ते म्हणाले. रोगराई पसरू नये यासाठी नागरी आरोग्य केंद्रामार्फत पालिका वैद्यकीय शिबीर भरवत आहे.