ऐश्वर्या अग्रवाल हत्याप्रकरण ऐश्वर्या अग्रवाल हत्याप्रकरणी तिच्या प्रियकरावर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाऱ्या विरारच्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी तिच्या कुटुंबीयांनी केली आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या ऐश्वर्या अग्रवाल (१९) या तरुणीचे सोहेल शेख या तरुणाशी प्रेमसंबंध होते. सोहेलने ऐश्वर्याला त्याचा मित्र दीपक वाघ्री (२८) याच्याकडे भेटायला बोलावले. तेथे शरीरसंबंध ठेवण्यासाठी दीपकने तिच्यावर जबरदस्ती केली. त्याला विरोध केल्याने दीपकने घरातील कुऱ्हाडीने वार करून तिची हत्या केली. पोलिसांनी सुरुवातीला सोहेल आणि दीपकला ताब्यात घेतले. मात्र, रात्री सोहेलला सोडून देण्यात आले. या प्रकरणात ऐश्वर्याच्या नातेवाईकांचा दबाव वाढल्यानंतर शनिवारी सायंकाळी सोहेलला अटक करण्यात आली. अग्रवाल कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी शनिवारी रात्री विरार पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून हलगर्जी करणारे पोलीस निरीक्षक युनूस शेख यांच्यावर कारवाई करून निलंबनाची मागणी केली. ऐश्वर्याचे वडील राजेश अग्रवाल यांनी या गुन्ह्य़ात अन्य काही जणांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त केला. तरुणाच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक वसई : विरार स्थानकाजवळ रुळांजवळ सापडलेल्या पवनकुमार पांडे या तरुणाच्या मृतदेहाचे गूढ उकलले आहे. पवनकुमारची हत्या केल्याप्रकरणी वसई रेल्वे पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याचे चौकशीतून पुढे आले आहे. नालासोपारा येथे राहणाऱ्या पवनकुमार पांडे (२८) याचा मृतदेह शुक्रवारी रात्री विरारच्या फलाट क्रमांक ८ जवळील रुळावर सापडला होता. शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू अपघाती नसून गळा दाबून झाल्याचे स्पष्ट झाले होते. पोलीस उपायुक्त दीपक देवराज तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बागवे यांच्या पथकाने तपास करून अवघ्या बारा तासांत पवनकुमार पांडे याचा चुलत भाऊ महेंद्र पांडेसह चौघांना अटक केली.