फय्याज शेख यांची खंत; ठाण्यात नाटय़संमेलनाला श्रीमंती सुरुवात नाटय़संमेलनाचे अध्यक्षपद हे निव्वळ शोभेचे असून उत्सवातील गणपतीसारखे हे पद औपचारिक आहे.. या पदावरील व्यक्तीला कोणतेही अधिकार नाहीत.. तसेच अतिशय कमी कालावधीचे हे पद आहे.. अशी खंत व्यक्त करत नाटय़संमेलनाध्यक्षांचा कालावधी किमान दोन वर्षांचा तरी असावा, अशी सूचना मावळत्या नाटय़संमेलन अध्यक्षा फय्याज शेख यांनी केली. ९६व्या अखिल भारतीय नाटय़संमेलनाला ठाण्यात शुक्रवारी सुरुवात झाली. यावेळी अध्यक्षपदाची सूत्रे गंगाराम गवाणकर यांच्याकडे सोपवताना व्यक्त केलेल्या मनोगतात फय्याज यांनी अध्यक्षपदाच्या अधिकारांबाबत खंत व्यक्त केली. ग्रंथदिंडी, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आणि नाटय़ क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती अशा वातावरणात शुक्रवारी नाटय़संमेलनाला श्रीमंती सुरुवात झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. उद्घाटनानंतर फय्याज यांनी अध्यक्षपदाची सूत्रे गंगाराम गवाणकर यांच्याकडे सोपवली. यावेळी त्या म्हणाल्या की, संमेलनाध्यक्षांनी रंगभूमीच्या हिताचे काही करावे अशी अपेक्षा असेल तर आधी त्यांची मुदत किमान दोन वर्षांची करावी. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना अलीकडे जसा निधी दिला जातो. तसाच निधी नाटय़ संमेलनाध्यक्षांनाही मिळावा, अशी अपेक्षा फय्याज यांनी व्यक्त केली. उद्घाटनप्रसंगी संमेलनाचे स्वागताध्यक्ष एकनाथ शिंदे, नाटय़ परिषदेच्या ठाणे शाखेचे अध्यक्ष खासदार राजन विचारे, नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. फय्याज यांच्या सूचना.. * नाटय़ संमेलनाचा अध्यक्ष निवडणुकीने निवडण्याचा प्रघात असला तरी घटनेत बदल करून ते पद सन्मानाने देण्यात यावे * रंगभूमीवरील कलावंतांनाच नव्हे तर पडद्यामागचे कलावंत, तंत्रज्ञ, नेपथ्य, प्रकाश योजना, संगीत आदी बाजू सांभाळणाऱ्या कलावंतांचाही संमेलनाध्यक्षपद देऊन गौरव करावा * मध्यवर्ती शाखा आणि नाटय़क्षेत्रातील बजुर्गानी मिळून संमेलनाध्यक्षांची बहुमानाने निवड करावी महाराष्ट्राची एक ठळक सांस्कृतिक खूण असलेल्या नाटय़कलेविषयीच्या दस्तावेजांचे एकाच ठिकाणी जतन व्हावे, या हेतूने मुंबईत एक भव्य नाटय़-संग्रहालय उभारण्यात येईल. - उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र शासनाने विविध बोलीभाषांतील लेखकांना त्यांच्या बोलीभाषेतील नाटक लिहायला भाग पाडून बोलीभाषांतील नाटकांच्या स्पर्धेचे आयोजन करावे. त्याचे पालकत्व नाटय़ परिषदेने घ्यावे आणि विजेत्या नाटकांचे सबंध महाराष्ट्रभर प्रयोग करावेत. - गंगाराम गवाणकर, नाटय़संमेलनाचे अध्यक्ष