विद्वानांचा आणि बहुजनांचा जातीयवाद हा हानिकारकच आहे, असे प्रतिपादन मावळते साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी शुक्रवारी येथे केले. स्वतंत्र विदर्भाची घंटा वाजत असून महाराष्ट्र जर खंडित झाला तर हुतात्म्यांचा अपमान ठरेल. विदर्भाचा सवतासुभा करून महाराष्ट्राचा सांस्कृतिक नकाशा तुटू नये, असे आवाहनही डॉ. सबनीस यांनी केले. महात्मा गांधी यांचा मारेकरी हा एक ब्राह्मण असल्याने सर्वच बहुजन ब्राह्मण समाजाकडे संशयाने पाहतात, पण बहुजनांमधील असलेल्या जातीयवादाचे काय़, असा सवाल डॉ. सबनीस यांनी केला. भ्रष्ट काँग्रेस नेत्यांनी महात्मा गांधी यांच्यातील ‘महात्मा’ कायमचा मारला. जात, धर्म आणि अन्य कोणत्याही प्रकारची दहशत मला मान्य नाही. त्याचा आपण निषेध करतो. दलित आणि ब्राह्मणेतर जातीय वादातून काही महापुरुषांच्या पत्नींबद्दल हीन पातळीवर व मने कलुषित करणारे लिखाण केले जात आहे. ब्राह्मण किंवा ब्राह्मणेतरांच्याही इतिहासाचे लेखन असे पक्षपाती असेल तर या दोन्हीचाही मी निषेध करतो, असेही डॉ. सबनीस यांनी सांगितले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणाले, बृहन्महाराष्ट्रातील शाळा व महाविद्यालयातून मराठी भाषा नष्ट होत चालली आहे. महाराष्ट्र शासनाने तेथील राज्य शासनावर आपला दबाव टाकावा आणि मराठी भाषा वाचवावी. बृहन्महाराष्ट्रासाठी राज्य शासनाने स्वतंत्र भाषिक धोरण राबवावे. तसेच मराठी भाषा व संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी राज्य शासनाने विभागीय साहित्य-संस्कृती मंडळे स्थापन करावीत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांचा विषय लवकरात लवकर मार्गी लावावा, असे आवाहन केले. साहित्य महामंडळाने हे संमेलन भरविण्यासाठी आगरी युथ फोरमला संधी दिल्याबद्दलही वझे यांनी आभार मानले. या सोहळ्यात महापौर राजेंद्र देवळेकर व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. ‘कणगा’ या स्मरणिकेचे तसेच ‘मी डोंबिवलीकर’च्या संमेलन विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी डोंबिवलीतील ज्येष्ठ कवी द. भा. धामणस्कर, भारतीय पोलीस प्रशासन सेवेतील आगरी समाजातील पहिले पोलीस अधिकारी अप्पर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक व ‘लोकसत्ता’चे पत्रकार आसाराम लोमटे यांचा या वेळी विष्णू खरे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला खाडिलकर यांनी केले.