ओमी यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय दिशाबदल

उल्हासनगर महापालिकेची निवडणूक यंदा पुन्हा कलानी घराण्याभोवती फिरत असून टीम ओमी कलानी यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यतेमुळे उल्हासनगरच्या राजकारणाची दिशा बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे भाजपची ताकद वाढून सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार भाजपमध्ये उडय़ा मारण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. त्यामुळे सध्या पुरेसे उमेदवार नसलेल्या भाजपकडे इच्छुकांची गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

उल्हासनगरच्या राजकारणाचे पान पप्पू कलानी यांच्याशिवाय हलत नव्हते. त्यानंतर भाजपचे कुमार आयलानी येथे आमदार म्हणून निवडून आले. गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र मोदी लाट असूनही सिंधी भाषिक प्रभावामुळे राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी येथून निवडून आल्या. त्यामुळे महापालिकेची सत्ता काबीज करायची झाल्यास कलानी घराण्यातील नेत्याला पक्षात घेतल्याशिवाय गत्यंतर नाही, असे भाजपने जाणले. त्यामुळेच ओमी कलानी गटाशी भाजपने अनेकदा चर्चाही केली. कलंकित नेता म्हणून ओळख पुसण्यासाठी जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांनीच दाखल केलेले गुन्हेही नुकतेच मागे घेण्यात आले. त्यामुळे ओमी कलानीचा भाजप प्रवेश सुकर झाला असल्याने भाजपची ताकद वाढल्याची भावना भाजपातील सिंधी मतदारांमध्ये आहे. त्याचप्रमाणे ही ताकद वाढल्याने भाजपचे नगरसेवक ३५ ते ४० जागांवर जिंकू शकतात, अशी शक्यता भाजपतील ज्येष्ठ नगरसेवक व्यक्त करतात. मराठी बांधवांनीही कधीही सिंधी नगरसेवक नाकारला नाही. त्याचा फायदा घेऊन भाजपची ताकद वाढणार असून त्यामुळेच येत्या काळात भाजपमध्ये सर्वपक्षीय इच्छुकांच्या उडय़ा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सिंधी आणि रिपाइंची मते तसेच भाजपचा परंपरागत मतदार अशी मांडणी केल्यास विजय निश्चित अशी धारणा झाल्याने भाजपचा पर्याय फायदेशीर ठरेल असे अनेक इच्छुक उमेदवारांना वाटते. त्यामुळे टीम ओमीचा भाजप प्रवेश झाल्यानंतर भाजपमधील ‘प्रवेशाचा ओघ’ सुरू होईल, असे बोलले जाते. त्यामुळे शहरातील सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार टीम ओमीच्या भाजप प्रवेशाकडे डोळे लावून बसल्याचे चित्र आहे.