ठाण्यातही अत्यावश्यक सेवा म्हणजे दूध डेअरी, किराणा मालाची दुकानं आणि मेडिकल्स हे वगळता सर्व दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाईनशॉप्सही बंद करण्यात आली आहे. लॉकडाउनच्या काळात दुकानं उघडण्याची मुभा दिली तरीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने शहरातील संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी हे आदेश दिले आहेत. करोना प्रतिबंधित क्षेत्र वगळून एका रस्त्यावर पाच बिगर आवश्यक दुकानं सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. मात्र ही संमती दिली असताना लोक या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचे दिसून आले. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन होत नसल्याचीही बाब समोर आली. तसेच यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं (वाईन शॉप्ससह) बंद करण्याचा निर्णय झाला आहे.