भाग्यश्री प्रधान

युगांतर प्रतिष्ठान, ठाणे</strong>

कलेचे माहेरघर असणारे शहर म्हणून ठाणे शहराची ओळख आहे. कला, व्याख्यानमाला, पारंपरिक लोककला, सामाजिक कार्य या माध्यमांतून विचारांची प्रगल्भता वाढत जाते. पारंपरिक कलेला आधुनिकतेची जोड देत तरुणांमध्ये कलेचे महत्त्व पटवून देतानाच तरुणांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य युगांतर प्रतिष्ठान ही संस्था करत आहे. या संस्थेने तरुण कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्याचे व्रतच घेतले आहे. या व्रताला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त अभिनेत्री संपदा जोगळेकर आणि ‘आयपीएच’च्या मंजुश्री पाटील यांचे ‘लिव्ह इन’ आणि ‘डायव्हर्स आऊट’ या विषयावर चर्चासत्र झाले.

धकाधकीच्या जीवनात पारंपरिक कला मागे राहात असल्याची ओरड नेहमीच होत असते. पूर्वी आठ दिवस तुडुंब गर्दीने भरणाऱ्या व्याख्यानमालेला सध्या तितकासा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र पाहावयास मिळते, तर तरुण वर्गाने व्याख्यानमालांसारख्या वैचारिक व्यासपीठांकडे चक्क पाठ फिरवल्याचे दिसते. एकंदरीत बदललेल्या परिस्थितीचा अंदाज घेत आणि व्याख्यानमालांसारखे वैचारिक व्यासपीठ बंद पडू नये यासाठी लोककला, व्याख्यानमाला अशा कार्यक्रमांना आधुनिकतेची जोड देण्याचे संघटित प्रयत्न ठाणे येथील युगांतर प्रतिष्ठान या संस्थेने सुरू केले. महाविद्यालयाच्या दुसऱ्या वर्षांत शिकत असतानाच आपली परंपरा टिकविण्यासाठी वैचारिक सांस्कृतिक चळवळीचे व्यासपीठ निर्माण करावे अशी कल्पना सात-आठ मित्र-मैत्रिणींच्या चमूला सुचली. त्यानंतर संस्थेची नोंदणी होण्यापूर्वीच त्यांनी एक वैचारिक व्याख्यानमालेचे आयोजन केले. त्या व्याख्यानमालेला अत्यल्प प्रतिसाद पाहून हे तरुण थोडे नाराज झाले. त्यानंतर व्याख्यानमाला, पांरपरिक लोककला मागे पडत असल्याची जाणीव या मुलांना झाली. तरुण कलाकारांना आपली कला तसेच विचार मांडायला हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी त्यांनी २८ मार्च २०१३ रोजी युगांतर प्रतिष्ठान या नावाने संस्थेची अधिकृत नोंदणी केली.

पहिल्या वर्षीच व्याख्यानमालेला प्रतिसाद मिळाला नसल्याने आधुनिक पद्धतीची जोड देत त्यांनी चर्चासत्र सुरू केले. त्यामुळे विचारवंतांसोबत प्रेक्षक आणि तरुणांना देखील विचार मांडण्याची संधी मिळाली. तरुणांची सध्याची समस्या लक्षात घेऊन करिअर, कला, राजकारण, समाजकारण, साहित्य, लैंगिक शिक्षण या सर्वच विषयांच्या चर्चासत्राचे दरवर्षी आयोजन केले जाते. गेली पाच वर्षे या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा कौस्तुभ बांबरकर नेटाने सांभाळत आहे. मुळातच या संस्थेचे सर्वच सदस्य २२ ते २७ वयोगटांतील असून आपापले व्यवसाय सांभाळून ते या संस्थेशीही जोडले गेले आहेत.

आपल्यासमोर उभे राहिलेले प्रश्न अनेक तरुणांना देखील सतावत असतील असा विचार करूनच विषय मांडले जात असल्याचे कौस्तुभने सांगितले. मुळात सहा ते सात जणांनी सुरू केलेल्या या संस्थेत सध्या २५ जण काम करत आहेत. इतकेच नव्हे तर ही संस्था संस्कृत भाषेचे जतन व्हावे यासाठी कार्यरत आहे. या भाषेची निदान ओळख असावी यासाठी धडपडणाऱ्या तरुण कलाकरांना देखील युगांतर प्रतिष्ठानतर्फे व्यासपीठ देण्यात आले. गेल्याच वर्षी राज्य नाटय़ संस्कृत एकांकिका स्पर्धेत युगांतर प्रतिष्ठानतर्फे ‘लगोरी’ नावाची संस्कृत एकांकिकादेखील सादर करण्यात आली. या एकांकिकेचा दिग्दर्शक दिगंबर आचार्य याने दिग्दर्शन विभागात दुसरा क्रमांक पटकाविला, असे कौस्तुभने सांगितले. तरुणांमध्ये असेलली कला जपणे, ती वाढवणे, त्याला आधुनिकतेची जोड देणे हेच संस्थेचे उद्दिष्ट असल्याचे कौस्तुभ सांगतो.

‘जस्ट से इट’ या उपक्रमात नवोदित कवी तसेच लेखकांना विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी एक चर्चासत्र घेतले जाते. यामध्ये साहित्याचे वाचनदेखील केले जाते. यापुढे देखील सामाजिक कार्यात जी तरुण मंडळी काम करतात, त्या संस्थांना मदत म्हणून तेथे काम करणे हा संस्थेचा उद्देश असून लायब्ररीच्या माध्यमातून चांगली पुस्तके तरुणांना वाचनासाठी उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे.

‘अ लिटल ऑफ एव्हरीथिंग’

साहित्याविषयी तरुणांमध्ये प्रेम निर्माण व्हावे यासाठी देखील ‘अ लिटल ऑफ एव्हरीथिंग’ या नावाने समाजमाध्यमावर एक उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये दर महिन्याला एक विषय दिला जातो. या विषयानुसार तरुणांना ‘लिहते व्हा’ हा संदेश दिला जातो. यामध्ये भाषेचे कोणतेही बंधन नसून तरुणांना त्यांच्या भावनांना वाट मोकळी करण्यासाठी एक हक्काची जागा मिळावी यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये त्या विषयानुसार एखाद्या तरुणाला चित्र काढावेसे वाटले तरीदेखील ते युंगातर प्रतिष्ठान या फेसुबकच्या पानावर ते प्रसिद्ध केले जाते किंवा एखाद्या विषयावर एखाद्या तरुणाने लिहिले की ते साहित्य समाज माध्यमांवर वाचनासाठी खुले होते.