शेतकरी अन्नधान्य पिकवतो म्हणून देशाचा गाडा चालतो. अन्नधान्य पिकवणारा बळीराजा थकला तर अन्नधान्य  शेतात पिकवणार कोण, असे प्रश्न उपस्थित करीत साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा गजर झाला पाहिजे. आत्महत्येपासून शेतकऱ्यांना परावृत्त करणारे लिखाण झाले पाहिजे, अशी मागणी करीत सोलापूर जिल्ह्य़ातील एका दुर्गम गावातील शेतकरी-वारकरी तब्बल २५ वर्ष राज्याच्या विविध भागांत भरणाऱ्या साहित्य संमेलनांना हजेरी लावून आपले विचार मांडत आहे. डोंबिवलीत सुरू झालेल्या साहित्य संमेलनालाही त्यांनी हजेरी लावली आहे. गुरुवारी संध्याकाळी साहित्य संमेलन भरत असलेल्या पु. भा. भावे साहित्यनगरीत संत गाडगेबाबांसारखी दिसणारी साधू वेशाच्या पेहरावात एक व्यक्ती वावरत होती. या साधूचे संमेलनस्थळी येण्याचे प्रयोजन काय म्हणून त्यांच्याकडे विचारणा केली, तेव्हा त्यांनी आपले अंतरंग उलगडले.

सोलापूर जिल्ह्य़ातील खैऱ्या गावच्या या साहित्यप्रेमी वारकऱ्याचे नाव फूलचंद नागटिळक आहे. ते स्वत: शेती करतात. फारसे शिक्षण न झालेल्या फूलचंदांना कविता करण्याचा छंद आहे. दरवर्षी ज्या ठिकाणी संमेलन आहे, तिथे स्वखर्चाने ते जातात. सर्वसामान्य रसिकांशी बोलतात. गावाकडच्या शेतकऱ्यांचे दु:ख आणि त्यांच्या समस्या शहरी रसिकांसमोर मांडण्याचा ते प्रयत्न करतात.