प्रवाशांच्या तक्रारींमध्ये दिवसागणिक वाढ; शिस्त लावण्यात वाहतूक विभाग अपयशी भिवंडीत आणि ठाणे शहरात रिक्षाचालकाने बसचालकाला मारहाण केल्याने रिक्षाचालकांच्या बेताल वर्तनाचे वास्तव समोर येताना शहरातील विविध चौकात रिक्षाचालकांची सुरू असलेली दादागिरी अद्याप संपुष्टात आलेली नसल्याचा प्रत्यय अजूनही प्रवाशांना येत आहे. भाडे नाकारणे, मनमानी कारभार करुन भाडे वाढ करणे अशा रिक्षाचालकांविषयी प्रवाशांच्या तक्रारी आहेत. मात्र चौकाचौकात अनधिकृतरीत्या ठाण मांडून बसलेल्या या रिक्षाचालकांच्या मुजोरीला अटकाव करण्यात वाहतूक पोलीस सपशेल अपयशी ठरत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप आहे. ठाणे शहरात नितीन कंपनी चौक, कॅडबरी नाका, गावदेवी या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या चौकात रिक्षाचे थांबे आहेत. काही परिसरातील चौकात रिक्षाचालकांनी अतिक्रमण केले असून येथे अनधिकृतरीत्या रिक्षा थांबा सुरूआहे. दिवसेंदिवस रिक्षाचालकांच्या असंवेदनशील कृत्यांमध्ये वाढ होत असून ठिकठिकाणी रिक्षाचालकांची मुजोरी थांबली नसल्याचे दिसत आहे. जवळच्या अंतरावरील भाडे नाकारणे, प्रवाशांशी उध्दटरित्या बोलणे, चौकात अतिक्रमण करून चुकीच्या पद्धतीने रिक्षाच उभ्या करणे यासारखे रिक्षाचालकांचे बेताल वर्तन अद्याप थांबलेले नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होत आहे. रिक्षाचालकांच्या मनमानीला आळा बसवण्याासाठी वाहतूक पोलिसांतर्फे व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तक्रार करण्याचा उपक्रम सुरू असला तरी रिक्षाचालकांची अरेरावी अद्याप थांबलेली नाही. योग्य कागदपत्रे नसणे, बॅच, परमिट नसणे यासारखे नियम मोडून रिक्षाचालक सर्रास रिक्षा चालवतात. वाहतूक पोलिसांतर्फे मुजोर रिक्षाचालकांवर वारंवार कारवाई होत असली तरी प्रवाशांच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. भाडे नाकारणे, उध्दट बोलून बेताल वर्तन करणाऱ्या रिक्षाचालकांच्या विरोधात प्रवासी हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधतात. वाहतूक पोलीस विभागातर्फे संबंधित ठिकाणी पोलिसांना कारवाईसाठी पाठवण्यात येते. प्रवाशांनी ८८७९११८८११ या क्रमांकावर संपर्क साधावा. - संदीप पालवे, उपायुक्त, वाहतुक पोलीस, ठाणे