‘सीएनजी’ रिक्षांच्या भाडय़ात दोन रुपयांची कपात कल्याण उपप्रादेशिक परिवहन क्षेत्रात सीएनजीवर धावणाऱ्या रिक्षांच्या दरात दोन रुपयांची कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सीएनजी रिक्षाचालकांनी यापुढे मीटरचे किमान भाडे १८ रुपये आणि त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १२ रुपये दर आकारावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कल्याण परिसरातील १९ हजार ७७० रिक्षा सीएनजीवर धावतात. प्रवासी हिताचा विचार करून सर्व रिक्षाचालकांनी तातडीने हे नवे दरपत्रक तसेच मीटर प्रणालीचा अवलंब करून प्रवासी भाडे आकारणीस सुरुवात करावी, असे आदेश कल्याण उपप्रादेशिक परिवहन विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी रिक्षाचालक, रिक्षा संघटनांना दिले आहेत. किमान भाडे आकारणीत रिक्षाचालकावर अन्याय होऊ नये आणि प्रवाशांना कोणताही भाडे दराचा भरुदड बसू नये म्हणून प्रत्येक रिक्षाचालकाने आपल्या रिक्षा मीटर अधिकृत मीटर दुरुस्ती केंद्रातून फेरफार (रिकॅलिब्रेशन) करून घ्यावेत, असे नाईक यांनी स्पष्ट केले आहे. कल्याण, डोंबिवली, बदलापूर, उल्हासनगर, टिटवाळा, अंबरनाथ या परिसरातील सीएनजी(नैसर्गिक गॅस) ऑटो रिक्षाचालकांना ठाण्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने प्रस्तावित केलेल्या भाडे दराप्रमाणे भाडे आकारणी करावी लागणार आहे. रिक्षा प्रवासी भाडय़ासाठी शासनाने नियुक्त केलेल्या हकीम समितीने कल्याण परिक्षेत्रातील ७८ टक्के रिक्षा सीएनजीवर धावत असताना चालक पेट्रोल दराने भाडे आकारणी करून प्रवाशांवर अन्याय करीत असल्याचे अहवालात म्हटले आहे. ही बाब लक्षात घेऊन आरटीओ प्रशासनाने रिक्षासंघटनांना विश्वासात घेऊन सीएनजी दरानुसार भाडेआकारणी करण्यासाठी राजी केले. त्यानंतर संबंधित प्रस्ताव ‘एमएमआरटीए’कडे (मुंबई महानगर रिजनल ट्रान्सपोर्ट अॅथॉरिटी) पाठवण्यात आला होता. त्याला प्राधिकरणाने आता मंजुरी दिली आहे. कल्याण ‘आरटीओ’ क्षेत्रातील सीएनजी रिक्षाचालक यापूर्वी किमान प्रवासी भाडे २० रुपये एवढे आकारत होते. त्याऐवजी चालकांना यापुढे १८ रुपये आकारावे लागणार आहेत. पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १३ रुपये ६५ पैशांऐवजी १२ रुपये २० पैसे भाडे आकारावे लागणार आहे. या आदेशाची कल्याण ‘आरटीओ’ विभागाने तातडीने अंमलबजावणी सुरू केली आहे. कल्याण परिसरातील सर्व रिक्षा संघटनांना या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे नंदकिशोर नाईक यांनी सांगितले. कल्याण क्षेत्रातील ७८ टक्के रिक्षा ‘सीएनजी’वर धावतात. उर्वरित पेट्रोलवर धावणाऱ्या रिक्षाचालकांना सीएनजी किटची सक्ती करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धनाचा विचार करून हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रवासी हितालाही प्राधान्य देण्यात येऊन ही नवीन दर आकारणीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक चालकाने मीटरप्रमाणे दर आकारणी करावी, असे सुचविण्यात आले आहे. अशी आकारणी न करणाऱ्या चालकांवर कारवाई करण्यात येईल. नंदकिशोर नाईक , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी , कल्याण.