बदलापूर शहरात करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ काही केल्या थांबण्याची चिन्ह दिसत नाहीये. गुरुवारी शहरात आणखी १२ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे शहरातील रुग्णसंख्येने २०० चा आकडा ओलांडला आहे. बुधवारीही १३ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. महत्वाची गोष्ट म्हणजे बदलापूर शहरातील अनेक नागरिक अत्यावश्यक सेवेसाठी दररोज मुंबईला ये-जा करत आहेत. या प्रवासादरम्यान त्यांना करोनाची लागण होत असल्याचं समोर येतंय. केल्या काही दिवसांत करोना बाधित रुग्णांमध्ये मुंबईत ये-जा करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचं आढळून आलं आहे.

गुरुवारी नव्या आढळलेल्या १२ रुग्णांपैकी ४ रुग्ण हे याआधी करोना झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेले होते तर उर्वरित ८ रुग्ण हे अत्यावश्यक सेवेसाठी रोज मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. अद्याप २१ जणांचे अहवाल येणं बाकी असल्यामुळे येत्या काळात शहरातील रुग्णसंख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

शहरात आतापर्यंत ७ रुग्णांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत, तर ८५ नागरिक उपचार घेऊन बरे झाल्यानंतर घरी परतले आहेत. बदलापुरातील करोनाग्रस्त रुग्णांवर बदलापूर, उल्हासनगर, ठाणे, भाईंदर, मुंबई यासारख्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील ६० रहिवासी संकुल प्रतिबंधित केली आहेत.