करोना काळात ग्रामीण भागातील महिलांना मोलाची मदत; १४३ बचत गटांना २ कोटींचे कर्ज वाटप ठाणे : जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिला मागील अनेक वर्षांपासून लघु उद्योग ते शेती अशा सर्व पद्धतीची कामे करत आहेत. या कामांमुळे ग्रामीण भागातील महिला आर्थिकदृष्टय़ा सक्षम होत आहेत. या महिलांची बँक संदर्भातील कामे सोपी व्हावीत, बँकेतून कर्ज उपलब्ध व्हावे याकरिता जिल्ह्य़ात २६ बँक सखी नेमण्यात आल्या आहेत. करोनाकाळात देखील बँक सखींनी ग्रामीण भागात उत्तम काम केले आहे. मागील तीन महिन्यांत जिल्ह्य़ातील अनेक बचत गटांना लाखो रुपयांचे कर्ज मिळवून दिले आहे. राज्य ग्रामीण जीवनोन्नतीच्या उमेद अभियानाअंतर्गत अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर या पाचही तालुक्यांमधील राष्ट्रीयीकृत बँकेत या बँक सखींची नेमणूक करण्यात आली आहे. महिलांना नवीन खाते उघडून देणे, कर्ज मिळवून देणे, शासनाच्या महिलांसाठीच्या विविध योजना गावागावात पोहचवणे आणि बँकेच्या संदर्भातील इतर सर्व कामे या बँक सखी करतात. जिल्'ाातील बचत गटांतर्फे शेळीपालन, कुक्कुटपालन, शेती, शिवणकाम, खानावळ, मसाले, पापड, लोणची तयार करणे त्याचबरोबर हातमाग सारखा व्यवसाय इत्यादी पद्धतीचे लघु उद्योग केले जातात. यासाठीची आर्थिक मदत शासनातर्फे त्यांना उपलब्ध करून देण्यात येते. बचत गट चालविणाऱ्या महिलांचे शिक्षण जेमतेम असल्याने बँकेच्या संदर्भातील कामे करणे त्यांना थोडे अवघड होते. यावेळी त्यांचे काम सोपे करण्यासाठी बँक सखी बँकेत कार्यरत असतात. करोना काळात ठप्प झालेले लघु उद्योग पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी बचत गटातील महिलांना कर्ज मिळवून देण्यात बँक सखी मोलाची भूमिका बजावत आहेत. मागील तीन महिन्यांच्या कालावधीत बँक सखींच्या मदतीने जिल्ह्यातील १४३ महिला बचत गटांना एकूण २ कोटी ४४ लाख २२ हजार रुपयांचे कर्ज मिळाले आहेत. ग्रामीण भागातील बँक सखी आपली सेवा देतात. या कामाच्या मोबदल्यात बँक सखींना मासिक अडीच हजार रुपये मानधन तर ५०० रुपये प्रवास भत्ता देण्यात येतो. तालुकानिहाय बँक सखींची संख्या ’ अंबरनाथ - ३ ’ मुरबाड - ७ ’ शहापूर - १० ’ कल्याण - ६ दोन वर्षांच्या कालावधीत वांगणीसारख्या ग्रामीण भागातील हजारो महिलांची बँकेची कामे करून देण्याबरोबरच मागील वर्षभरात एकूण १० बचत गटांना कर्ज मिळवून दिले आहे. ग्रामीण भागातील महिला या बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्टय़ा सक्षम होत असल्याने काम करण्याचे समाधान मिळत आहे. - रुपाली पाटील, बँक सखी, अंबरनाथ