भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमीची नूतनीकरणाच्या कामानंतर अवघ्या दीड वर्षांतच दुरवस्था झाली होती. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘लोकसत्ता’ वसई विरारमध्ये सचित्र प्रसिद्ध होताच त्याची दखल घेत आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे आदेश दिले. भाईंदर पश्चिम येथील जुन्या स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम महापालिकेने हाती घेतले होते. या नूतनीकरणाच्या कामावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. नव्या पद्धतीच्या शेगडय़ा, अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांसाठी सुसज्ज आसन व्यवस्था, थंडगार पिण्याचे पाणी अशा सुविधा स्मशानभूमीत उपलब्ध करून देण्यात आल्या. परंतु अवघ्या दीड वर्षांतच स्मशानभूमीची अक्षरश: दुर्दशा झाली. नवीन बसविण्यात आलेल्या शेगडय़ांची तुटफूट, आसन व्यवस्थेच्या ठिकाणी अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचा कुलर बंद पडणे, दफनभूमीच्या जागेवर झुडपे उगवणे अशी या स्मशानभूमीची अवस्था झाली होती. माजी नगरसेवक ओमप्रकाश गाडोदिया स्मशानभूमीच्या या दुरवस्थेबाबत गेल्या दोन महिन्यांपासून पत्रव्यवहार करत होते. मात्र त्यानंतरही परिस्थितीत फरक झाला नाही. याबाबतचे सविस्तर वृत्त लोकसत्ता वसई विरारने प्रसिद्ध केले. या वृत्ताची आयुक्त बालाजी खतगांवकर यांनी गंभीर दखल घेतली आणि दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याचे आदेश दिले. तुटलेल्या शेगडय़ांच्या जागी आता लोखंडी शेगडय़ा बसविण्यात आल्या आहेत. दफनभूमीची जागादेखील स्वच्छ करण्यात आली आहे तसेच थंड पाण्यासाठी कुलरची दुरुस्ती करून तो जागेवर बसविण्यात आला आहे. ग्रामपंचायत काळापासून या स्मशानभूमीची देखभाल ग्रामस्थच करत असते. गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींनी कायम या स्मशानभूमीची देखरेख केली, त्यात वेळोवेळी सुधारणा घडवून आणल्या. या व्यक्तींनी दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून या प्रतिष्ठित व्यक्तींच्या नावाचा फलक स्मशानभूमीत लावण्यात आला होता. नूतनीकरणाच्या कामात हा फलक काढण्यात आला. परंतु काम पूर्ण झाल्यानंतरही फलक पूर्ववत लावण्यात आला नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती. ग्रामस्थांनी महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर आता हा नामफलक लवकरच स्मशानभूमीत दर्शनी भागात लावण्यात येणार आहे.