शहरातील खाडीकिनारी, जंगल, टेकडीसारख्या भागांत अनेक पक्षी आपल्याला सकाळ-संध्याकाळ पाहायला मिळतात. जगण्याच्या धावपळीत आपण आपल्या आजूबाजूला असलेल्या निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत नाही. खरे तर या निसर्ग निरीक्षणाने आपल्या मनावरील ताण हलका होऊ शकतो. मात्र निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी पक्षी जगताविषयी माहिती असणे आवश्यक आहे. ठाणे-रायगड पक्षी मित्र संघटना याबाबतीत जनजागृती आणि मार्गदर्शनाचे काम करीत आहे. अलीकडेच रोटरीच्या सहकार्याने या संस्थेने कल्याण-डोंबिवलीत पक्षी निरीक्षण स्पर्धा आयोजित केली होती. यानिमित्ताने या संस्थेच्या कार्यप्रणालीविषयी जाणून घेण्यासाठी अध्यक्ष प्रथमेश देसाई यांच्याशी साधलेला संवाद.. प्रथमेश देसाई, ठाणे- रायगड पक्षी मित्र संघटना * ठाणे आणि रायगड पक्षीमित्र संघटना कधी स्थापन झाली? महाविद्यालयात प्रशिक्षण घेत असतानाच पक्ष्यांविषयी मनात आकर्षण होते. सकाळी महाविद्यालयात जाताना पाणवठय़ाच्या ठिकाणी विविध पक्षी दिसायचे. हे पक्षी पाहून आनंद व्हायचा. पक्षी पाहता पाहता त्यांची माहिती जाणून घ्यावी, त्यांचा दिनक्रम समजून घ्यावा असे विचार मनात आले. मित्र किरण कदम व मी आम्ही सोशल मीडियावर किंवा इतर ओळखीच्या माणसांना विविध पक्ष्यांचे फोटो काढून त्यांच्याविषयी माहिती विचारण्यास सुरुवात केली. प्रत्येकाकडून माहिती गोळा करीत आम्ही या पक्ष्यांविषयी जाणून घेण्यास सुरुवात केल्यानंतर लक्षात आले की, आपल्यासारखेच अनेकांना पक्ष्यांची माहिती नाही. त्यांच्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्याचे मनात आले आणि किरणच्या मदतीने २०११ मध्ये ठाणे आणि रायगड पक्षीमित्र संघटना स्थापन केली. किरणची यात मोलाची साथ लाभली असून आम्ही दोघे मिळून ही संघटना चालवीत आहोत. * संघटनेचे उद्देश कोणते? आपल्या आजूबाजूचा प्रदेश जैवविविधतेने नटलेला आहे. जैवविविधतेचे वरदानच आपल्याला लाभले आहे. विविध प्रकारचे पक्षी या निसर्गसौंदर्यात मोलाची भर टाकतात. हिवाळ्यात तर स्थलांतरित पक्षी यात आणखीच खुलून दिसतात. या पक्ष्यांची माहिती, त्यांचे संवर्धन कसे करावे, ते कसे पाहावे आदी माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविणे थोडक्यात माहितीचे आदानप्रदान करणे हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे. साधारणत: सर्व जण नोकरी सांभाळून हे काम करीत असल्याने रविवारी सुट्टीच्या दिवशी आम्ही एकत्र जमतो. याविषयी सर्व सोशल नेटवर्किंगवर ग्रुप्स तयार केले असून त्याद्वारे चर्चा होते. सर्व लोकांना पक्ष्यांची माहिती त्वरित मिळावी यासाठी फेसबुकवरही स्वतंत्र ग्रुप आहे. कोणालाही कोणत्याही पक्ष्याची माहिती हवी असेल तर या ग्रुपवर ती माहिती तुम्हाला मिळेल. परदेशी नागरिकही या ग्रुपच्या माध्यमातून येथील पक्षी निरीक्षण करतात. त्यांच्या शंका विचारतात, या सोशल साइटद्वारे साडेचार हजारांहून अधिक सभासद जोडले गेले आहेत. * कल्याण-डोंबिवलीत पक्षी निरीक्षण ही स्पर्धा घेण्यामागचे कारण काय, या स्पर्धेला कसा प्रतिसाद लाभला? २०१२ पासून न्यास संस्थेच्या सोबतीने डोंबिवली शहरात पक्षी निरीक्षण केले जायचे. एक एक टीमला विशिष्ट ठिकाणी नेऊन पक्षी दाखविले जायचे. तीन वर्षे हा उपक्रम सुरळीत राबविण्यात आला. मात्र नंतर त्यात खंड पडला. तेव्हा आम्ही अशा प्रकारचा उपक्रम पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यात नावीन्य आणण्याच्या उद्देशाने स्पर्धा घेण्याचा विचार पुढे आला. मुंबईमध्ये अशा प्रकारे स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यात आम्ही अनेकदा प्रथम क्रमांकही पटकाविला आहे. त्या वेळी आमच्यासोबत अनेक लहान मुलेही असायची. दिवसभर फिरून ती बिचारी मुले पक्षी शोधायचे. त्यांचा नंबर येणे कठीण होते. तेव्हा मनात विचार आला की, सर्व वयोगटांतील मुलांसाठी या स्पर्धा घ्याव्यात. त्या पद्धतीने या वर्षी त्या घेतल्या. यात शालेय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. लोकांच्या मनात पक्ष्यांविषयी कुतूहल निर्माण व्हावे, हा या स्पर्धेमागचा उद्देश होती, तो सफल झाला. * स्पर्धेतून किती पक्ष्यांची नोंद झाली, स्थलांतरित पक्षी कोणकोणते येथे येतात? कल्याण-डोंबिवली शहरात विविध प्रकारचे २५० पक्षी पाहावयास मिळाले. दरवर्षी पाच ते सहा बदके आणि इतर पक्षी स्थलांतरित होऊन कल्याण, डोंबिवली, ठाणे आदी परिसरांतील खाडीकिनारी येतात. यंदा एक दुर्मीळ पक्षी कल्याण-डोंबिवलीत आढळला तो म्हणजे पांढरा करकोचा. हा पक्षी गुजरातचा असून तो महाराष्ट्रात फार कमी पाहावयास मिळतो. कल्याण-डोंबिवलीत याच्या तीन नोंदी आढळल्या असून नुकताच तो ठाणे येथील घोडबंदर येथेही आढळला आहे. कल्याण-डोंबिवलीत ६० टक्के स्थलांतरित पक्षी व ४० टक्के स्थानिक पक्षी पाहायला मिळतात. येथील खाडीकिनारा, पडले गावातील जंगल, भोपरची टेकडी, खाडीकिनारा या ठिकाणी जैवविविधता टिकून असल्याने स्थलांतरित पक्षी येथे मोठय़ा प्रमाणावर वास्तव्य करतात. युरोपवरून कॉमन मायग्रेटरी डक स्पायसेस, नॉर्दन शॉवेलर, नॉर्दन पीनटेल, गडवाल, कॉमन टेल हे पक्षी येथे येतात. * जनजागृतीसाठी संघटनेचे कोणते उपक्रम सुरू आहेत? पर्यावरणीय दृष्टिकोनातून पक्षिगणनेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एखाद्या प्रजातीच्या पक्ष्याची स्थिती नेमकी कशी आहे, म्हणजे तो संकटग्रस्त आहे, भावी संकटग्रस्त आहे की थेट नामशेषच झाला आहे याची माहिती पक्षिगणनेवरून कळते आणि त्यावरूनच उपायही योजले जातात. याविषयी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती महत्त्वाची आहे, त्यानुसार शालेय विद्यार्थ्यांना याविषयी मार्गदर्शन करण्याचा आमचा विचार आहे. कल्याण-डोंबिवलीत घेतलेल्या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून हाही उपक्रम यशस्वी होईल अशी आशा आहे. तसेच वसई-विरारमध्ये पक्षी महोत्सव आयोजित करण्याचा विचार आहे. येथील स्थानिक लोकांना, मच्छीमारांना मार्गदर्शन करून त्यांना पक्षी निरीक्षणाचे महत्त्व सांगण्यात येणार आहे. त्यांच्या मदतीने पक्ष्यांचे संवर्धन करणे अत्यंत सोपे होईल. त्यांना पक्ष्यांची माहिती होण्यासाठी पक्षी b छायाचित्र प्रदर्शन भरविण्याचा मानस आहे. संपूर्ण ठाणे आणि रायगड जिल्ह्य़ातील पक्षी संवर्धनासाठी ही संस्था कार्यरत राहणार आहे.