उल्हासनगर : गेल्या वर्षी उल्हासनगरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपच्या ‘टीम ओमी कलानी’ गटाच्या बंडखोरीचा फटका भाजपला बसल्याने महापौरपद गमवावे लागले होते. त्यानंतर आता स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीतही भाजपात पुन्हा बंडखोरी उफाळून आली आहे. भाजपतर्फे अधिकृत दोन अर्ज दाखल केले गेले असतानाही भाजपच्या विजय पाटील यांनी शिवसेनेच्या पाठिंब्यावर सभापतीपदासाठी स्वतंत्र अर्ज दाखल करत बंडखोरी केली. त्यामुळे पुन्हा भाजपात फुट पडल्याचे चित्र आहे. सोमवारी स्थायी समिती आणि प्रभाग समितीच्या सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले. यात बंडखोरी टाळण्याची मोठी व्हूयरचना करूनही भाजपला पुन्हा बंडखोरीचा फटका बसला. भाजपच्या वतीने जया माखिजा आणि राजकुमार जग्यासी असे दोन अधिकृत अर्ज दाखल करण्यात आले. मात्र त्याचवेळी भाजपचे सदस्य विजय पाटील यांनीही अर्ज दाखल केल्याने भाजपात एकच खळबळ उडाली.या बंडखोरीबाबत भाजपचे जिल्ह्याध्यक्ष जमनू पुरस्वानी यांना विचारले असता, भाजपने दोनच अर्ज दाखल केले होते. विजय पाटील हे अधिकृत उमेदवार नसून त्यांच्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.