उल्हासनगरमधील राजकीय परिस्थिती दररोज बदलत असून शत-प्रतिशत भाजपच्या आकांक्षामुळे शिवसेनेनंतर आता रिपाइंही भाजपची साथ सोडणार असल्याचे बोलले जाते. ओमीच्या कोंडीसाठी रिपाइंला घाईघाईत जाहीर केलेल्या जागा आता ओमी कलानी मागत असल्याने रिपाइं या जागा जाण्याच्या भीतीने सावध भूमिका घेत नवे पर्याय शोधत असल्याचे कळते आहे. त्यामुळे भाजप आपणच टाकलेल्या जाळ्यात अडकण्याची भीती आहे.

उल्हासनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून महत्त्वाकांक्षी बनलेल्या भाजपने आपल्या सर्व जुन्या मित्रांना दूर करत सत्तेची समीकरणे जुळवण्यास सुरुवात केली असून त्यामुळे सहकारी पक्षांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. टीम ओमी कलानीसोबत सत्ता साधण्याच्या प्रयत्नात उल्हासनगरमधून शिवसेना पक्ष दूर गेल्याने गेल्या वीस वर्षांतील युती संपुष्टात आल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीपासून साथ देणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षालाही गृहीत धरत टीम ओमीसोबत चर्चा सुरू केल्याने रिपाइं संभ्रमात सापडली आहे. टीम ओमी कलानीचा गड मानला जाणारा कलानी महल परिसरात रिपाइंचा दबदबा आहे. मात्र त्याच वेळी टीम ओमी कलानीला सातत्याने विरोध करणाऱ्या भाजप जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी ओमी कलानीची कोंडी करण्यासाठी त्यांच्या प्रभाव क्षेत्रातील १२ जागा रिपाइंला घाई गडबडीत जाहीर करून टाकल्या.