वसई पश्चिम पट्टय़ातून भाजपला अधिक मते नाहीत

बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला असलेल्या वसई भागातून मते मिळवण्यासाठी भाजपने महापालिकेतून २९ गावे वगळण्याची खेळी केली, मात्र त्याला या गावांतील ग्रामस्थांनी दाद दिली नसल्याचे लक्षात येत आहे. वसई पश्चिम पट्टय़ातील या गावांमधून भाजपला कमी मतदान झाल्याचे दिसून येत असून भाजपची ही खेळी व्यर्थ गेल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, आम्हाला ग्रामपंचायत नको, महापालिकाच हवी आहे, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

वसई-विरार महापालिकेची स्थापना झाली, तेव्हा चार नगर परिषद आणि परिसरातील ५६ गावांचा समावेश करण्यात आला होता. मात्र वसईतील २९ गावांचा तीव्र विरोध होता. परंतु तो विरोध डावलून २९ गावांचा महापालिकेत समावेश झाल्याने मोठे आंदोलन उभे राहिले होते. याच आंदोलनामुळे जनआंदोलनाचा एक आमदार आणि महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत गावसमर्थक २१ नगरसेवक निवडून आले होते, तेव्हापासून गावे वगळण्याचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. परंतु गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २९ गावे महापालिकेतच राहावी, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीनिशी उतरला होता. जर वसईच्या पश्चिम पट्टय़ातील ग्रामस्थांची मते मिळवायची असतील तर गावांचा मुद्दा घ्यावा लागेल, असे त्यांनी ठरवले आणि मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीच्या आधी गावे महापालिकेतून वगळावीत, असे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले.

गावे वगळण्याचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने या गावातील भरभरून मते मिळतील, अशी भाजपाची आशा फोल ठरली. वसईतून भाजपला केवळ ३१ हजार ६११ मते मिळाली तर बहुजन विकास आघाडीला ६४ हजार ४७८ मते मिळाली. वसईच्या पश्चिम पट्टय़ातील मतदारांनी भाजपऐवजी बहुजन विकास आघाडीला कौल दिल्याचे हे स्पष्ट झाले आहे. गावे वगळण्याची खेळी गावकऱ्यांनी ओळखळी असून त्यांनी  गास गावातील ग्रामस्थ रॉबर्ट परेरा यांनी याबाबत बोलताना सांगितले की, येथील ख्रिस्ती मतदार तसा काँग्रेसचा पारंपरिक मतदार आहे. मात्र काँग्रेसचा प्रभाव कमी झाला होता. गावे आता महापालिकेत आहेत. मागच्या पालिका निवडणुकीत या पट्टय़ातून सर्व बहुजन विकास  आघाडीचे नगरसेवक मोठय़ा संख्येने निवडून आले होते. याचा अर्थ त्यांना महापालिका हवी आहे असाच होतो, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री दिशाभूल करतात हे लोकांनी ओळखले आहे.  दोन वेगवेगळी प्रतिज्ञापत्रे न्यायालयातसादर करणे, गावे वगळणे ही निवडणुकीतील खेळी आहे हे लोकांनी ओळखले आणि म्हणून भाजपला दूर ठेवल्याचे ते म्हणाले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनीही पश्चिम पट्टय़ातून मते न मिळाल्याचे मान्य केले. आम्ही गावे वगळण्याचा मुद्दा प्रभावीपणे गावांपर्यंत पोहोचवू शकलो नाही म्हणून मते भाजपला मिळाली नाही, असे त्यांनी सांगितले.

ज्या मुख्यमंत्र्यांनी गावे वगळू नका, असे प्रतिज्ञापत्र दिले त्याच मुख्यमंत्र्यांनी गावे वगळा असे प्रतिज्ञापत्र निवडणुकीच्या तोंडावर दिले. दोन परस्परविरोधी भूमिका असल्याने आम्ही भाजपावर कसा काय विश्वास ठेवायचा? जनता भाजपाच्या या खेळीला भुलली नाही.           – ऑल्वीन रॉड्रीक्स, नानभाट  गाव