राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते गणेश नाईक यांनी भाजपशी जवळीक साधल्याने युती झाल्यास नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा प्रबळ होऊ लागल्याने शिवसेनेने ठाणे शहर मतदारसंघासाठी आक्रमक मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेच्या गोटातील या हालचालींमुळे सावध झालेल्या ठाण्यातील भाजप नेत्यांनी कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघाची अदलाबदल करू नये यासाठी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांकडे आग्रह धरला असून राज्यमंत्री रिवद्र चव्हाण यांच्यामार्फत शिवसेनेचे मनसुबे हाणून पाडण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत भाजपने मोठय़ा मताधिक्याने विजय मिळविला. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीतही भाजपचे शहर मतदारसंघातून शिवसेनेपेक्षा अधिक जागा मिळविल्या. नौपाडा, पाचपाखाडी यांसारख्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारली. वागळे इस्टेट, वर्तकनगर यांसारख्या पट्टयात शिवसेनेने मोठा विजय मिळविल्याने ठाणे महापालिकेत या पक्षाची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली असली तरी ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात सातत्याने होणारी पिछेहाट शिवसेना नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे युतीच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ पुन्हा पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून गणेश नाईक यांच्या भाजप जवळीकीनंतर तर या प्रयत्नांना आणखी वेग आला आहे. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांनीही आक्रमक भूमिका घेत कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ अदलाबदलीत शिवसेनेला सोडू नये यासाठी प्रयत्न सुरू केले असून मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असणारे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत शिवसेनेला धोबीपछाड देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

नवी मुंबईच्या बदल्यात ठाणे

गणेश नाईक यांचा भाजप प्रवेश निश्चित असल्याने तेथील दोन्ही विधानसभा मतदारसंघ युतीच्या देवाणघेवाणीत भाजपकडे जाण्याची शक्यता अधिक आहे. सद्यस्थितीत बेलापूर येथे भाजपच्या आमदार असून ऐरोलीचे विद्यमान आमदार भाजपमध्ये आल्याने तेथेही या पक्षाचा दावा प्रबळ आहे. यापूर्वी नवी मुंबईतील एक जागा शिवसेनेच्या वाटय़ाला येईल, अशी चिन्हे होती. युती झाल्यास ही शक्यता धुसर असल्याने शिवसेनेने आता ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावर दावा सांगितला आहे. वेगाने सुरू असणाऱ्या या घडामोडींमुळे भाजपचे ठाण्यातील नेतेही सावध झाले असून महापालिका हद्दीत भाजपच्या ताब्यात असलेली विधानसभेची एकमेव जागा शिवसेनेला देता कामा नये यासाठी वस्तुनिष्ठ अहवाल मुख्यमंत्री तसेच प्रदेशाध्यक्षांना पाठवला जात आहे. भविष्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीशी ठाण्यात लढत कायम ठेवायची असेल तर ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ भाजपकडे असायलाच हवा, असे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. तसे झाले नाही तर संपूर्ण महापालिका क्षेत्र शिवसेनेला आंदण दिल्यासारखे होईल आणि हे नेत्यांनाही मान्य होणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका बडय़ा नेत्याने दिली.

ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला देता कामा नये, अशा भावना यापूर्वीच मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना कळवल्या आहेत. राज्यमंत्री रिवद्र चव्हाण हेही याच मताचे आहेत. गेल्या काही वर्षांत शहर मतदारसंघातील परिस्थिती भाजपला अतिशय अनुकूल असून शिवसेना म्हणेल ती पूर्वदिशा, असे जागावाटपात होणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे.

– मिलींद पाटणकर, ज्येष्ठ नगरसेवक, भाजप