गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शिवसेना-भाजपमधील सुप्त संघर्षांवर बोलताना, सामंजस्यातून नेहमी युती टिकते. आम्ही एकमेकांना खूप सांभाळून घेत होतो. आता ती सामंजस्यता काही प्रमाणात कमी झालेली दिसते, अशा शब्दांत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी सध्याच्या युती सरकारवर आपले परखड मत व्यक्त केले.
बदलापूर शिक्षण समितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांरंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोहर जोशी बदलापुरात आले होते. त्या वेळी पत्रकारांशी बोलत असताना सध्या भाजप-शिवसेना युतीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरींबाबत त्यांनी मत व्यक्त केले. आम्ही चर्चेने अनेक वाद सोडवले होते. आताही तसे झाल्यास वाद संपुष्टात येऊन चांगली कामे होतील, अशी भावनाही त्यांनी या वेळी व्यक्त केली.