अनेक मृत कर्मचाऱ्यांची पत्नी, मुलांचे अर्ज बाद ठरण्याची भीती मुंबई महापालिकेच्या सेवेतील कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास अथवा आजारपणामुळे अकार्यक्षम ठरल्यास त्याची पत्नी अथवा मुलांना माणुसकीच्या नात्याने अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात येते. परंतु, अनुकंपा तत्त्वावर नोकरी देताना वयाबाबतचे वेगवेगळे नियम लावून जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचे नातलग अपात्र कसे ठरतील असे पालिकेचे धोरण राहिले आहे. आता अनुकंपा तत्वावर देण्यात येणाऱ्या नोकरीसाठीही वयोमानाची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक मृत कर्मचाऱ्यांच्या पत्नींनी पालिकेच्या सेवेत नोकरी मिळविण्यासाठी केलेले अर्ज बाद होण्याची चिन्हे आहेत. प्रशासनाने एक परिपत्रक काढून हे बंधन घातल्यामुळे पालिकेतून माणूकीचा झरा आटू लागल्याची टीका कर्मचारी वर्गाकडून केली जात आहे. एकेकाळी पालिकेच्या सेवेतील सफाई कामगारापासून वरिष्ठ अधिकाऱ्याचे निधन झाल्यास अथवा आजारपणामुळे ते अकार्यक्षम ठरल्यास अनुकंपातत्वावर त्याची पत्नी अथवा मुलांना नोकरी दिली जात होती. परंतु काही वर्षांपूर्वी खातेप्रमुख आणि त्यावरील अधिकाऱ्यांना अनुकंपातत्वातून पूर्णपणेच वगळण्यात आले. तर सफाई कामगाराच्या बाबतीत लाड-पागे समितीच्या शिफारशीनुसार त्याची पत्नी अथवा मुलांना पालिकेत नोकरी दिली जाते. इतर सर्व विभागांमध्ये काम करणाऱ्या खातेप्रमुख व वरिष्ठ अधिकारी वगळता अन्य कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास वा तो आजारपणामुळे अकार्यक्षम ठरल्यास पत्नी वा मुला-मुलीस सेवेत घेतले जात होते. तसेच पूर्वी सेवानिवृत्तीस सहा महिने शिल्लक असताना एखादा कर्मचारी आजारपणामुळे अकार्यक्षम ठरल्यास त्याची पत्नी-मुलांना नोकरी मिळू शकत होती. परंतु प्रशासनाने अकार्यक्षम ठरणाऱ्या कर्मचाऱ्याचे वय ५६ वर्षांपेक्षा अधिक असल्यास पत्नी-मुलांना नोकरी नाकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. हळूहळू ही वयोमर्यादा ५३ वर्षे आणि आता ५० वर्षे करण्यात आली आहे. वयोमर्यादेच्या या अटीमुळे अशा कर्मचाऱ्याची पत्नी अथवा मुलांना पालिकेत नोकरी मिळण्याचा मार्ग हळूहळू बंद होऊ लागला आहे. आता काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने एक अजब परिपत्रक जारी केले आहे. सेवेत असताना निधन झालेल्या अथवा अकार्यक्षम ठरणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पत्नीचे वय ४५ वर्षे असेल तरच तिला पालिकेची नोकरी मिळेल, असा फतवा या परिपत्रकाद्वारे काढण्यात आला आहे. प्रशासनाच्या परिपत्रकामुळे वयाची ४५ वर्षे ओलांडलेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला आता पालिकेचे दरवाजे बंद झाले आहेत. पालिका दरबारी अजघडीला मृत वा अकार्यक्षम कर्मचाऱ्याची पत्नी वा मुलांचे सुमारे १५० हून अधिक अनुकंपातत्वावरील अर्ज प्रलंबित आहेत.