आपल्या मालकीच्या झाडवरील आंबे तोडल्याचा राग मनात धरून सख्ख्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जयवंत पाटील असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघरमधील वाडा तालुक्यातील पालसईत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बुधवारी दिलीप पाटील यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या आंब्याच्या झाडाचे आंबे पाडल्याचा राग मनात धरून त्यांचा सख्खा भाऊ जयवंत पाटील यांनी जाब विचारत हातातील दांडक्याने मारहाण केली. जखमी झालेल्या दिलीप पाटील यांना वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र दिलीप पाटील गंभीर जखमी असल्यामुळे डॉक्टरांनी तात्काळ अधिक उपचारासाठी मुंबई येथील जेजे हॉस्पिटलमध्ये नेहण्यास सांगितले. मात्र, उपचारादरम्यान, दिलीप यांचा मृत्यू झाला.

वाडा पोलीस ठाण्यात जयवंत पाटील व त्यांची पत्नी जयश्री जयवंत पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गोविंद बोराडे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.