१०० ते १५० कॅमेरे दररोज बंद; पोलिसांच्या कामात अडथळे ठाणे : ठाणे शहरात महापालिकेने बसविलेल्या १ हजार ४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी दररोज १५० सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रिक अडचणी, झाडांच्या फांद्या पडणे, वारा यामुळे बंद होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. दररोज एवढय़ा मोठय़ा प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बंद होत असल्याने पोलिसांवरील कामाचा ताण वाढला असून नागरिकांची सुरक्षाही वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. ठाणे, कळवा आणि मुंब्रा शहरात सुरक्षेच्या दृष्टीने महापालिकेने १ हजार ४०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये चित्रित होणारी सर्व माहिती हाजुरी येथील नियंत्रण कक्षात संकलित केली जात असते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेले हे सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रिक अडचणी, झाडांच्या फांद्या पडणे, वारा, पाऊस यांमुळे बंद होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे दररोज १ हजार ४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी दिवसाला १४० ते १५० सीसीटीव्ही कॅमेरे बंद होत असल्याची माहिती महापालिकेतील एका अधिकाऱ्याने दिली. या तांत्रिक अडचणीमुळे पोलिसांचाही कामाचा ताण वाढला आहे. काही दिवसांपूर्वी मोबाइल चोरटय़ांसोबत प्रतिकार करताना एका तरुणीचा धावत्या रिक्षातून पडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर चोरटे मोबाइल फोन घेऊन तीन हात नाका येथील उड्डाणपुलाखालून भिवंडीच्या दिशेने गेले होते. पोलिसांना या घटनेतील चित्रीकरण तपासायचे होते. हे सीसीटीव्ही चित्रीकरण अत्यंत अस्पष्ट होते. सुदैवाने तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे चोरटय़ांना अटक करण्यात यश आले, असे नौपाडा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले. आम्ही सीसीटीव्हीसंदर्भात वारंवार ठाणे महापालिकेकडे पत्रव्यवहार करत असतो. त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होते, असेही एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. काही तांत्रिक अडचणीमुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण नियंत्रण कक्षात पोहोचत नसते. याची माहिती मिळाल्यानंतर आमचे कर्मचारी तात्काळ त्याची दुरुस्ती करत असतात. तसेच ठाणे पोलिसांनाही त्यांनी चित्रीकरण मागितल्यानंतर ते दिले जाते. - विनोदकुमार गुप्ता, उपनगर अभियंता, विद्युत विभाग, ठाणे पालिका.